कोल्हापूर – रिक्षा चालकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी रिक्षा चालकांचे कल्याणकारी मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
पंचगंगा रिक्षा स्टॉपचे रिक्षाचालक सुरेश तोरस्कर यांनी पाच तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग पॅसेंजरला प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणिक रिक्षा चालक तोरस्कर यांचा सत्कार करण्यात आला.
क्षीरसागर म्हणाले, ‘राज्यातील लाखो रिक्षा चालकांसाठी रिक्षा कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत यशस्वी पाठपुरावा केला. राज्यातील रिक्षा व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना सामाजिक सुरक्षा व कल्याणनिधी योजना पुरविण्यासाठी या मंडळाच्या माध्यमातून रिक्षा व्यावसायिकांना न्याय देण्याचा प्रयत्न होता.
परंतु, रिक्षा व्यावसायिकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना होवूनही, मंडळ कार्यान्वित नसल्याने व त्यातच कोविड १९ च्या काळातील टाळेबंदी नंतर सर्वसामान्य रिक्षा व्यावसायिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात अशा संकटांचा सामना करण्यासाठी रिक्षा चालकांचे कल्याणकारी मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करू. यासह योजनेत नोंदणीकृत चालकांना वैयक्तिक अपघात मदत, निवृत्ती योजना, अंत्यसंस्कारासाठी मदत व लग्न कार्यासाठी मदत अशा लाभांचा समावेश करण्यासाठीही पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, किशोर घाटगे, सुशील भांदिगरे, रियाज बागवान, रवी बावडेकर, तानाजी भोसले, सतीश रायकर, परवेश बागवान, शकील अत्तार, अण्णा गायकवाड, कपिल मुळे आदी उपस्थित होते.