अमोल बनकर
सासवड -बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटावर सध्या कॉंग्रेसचे दत्ता झुरंगे यांची पकड असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुदामराव इंगळे यांचा बालेकिल्ला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारामुळे इंगळे यांना पराभवाची चव चाखावी लागली होती तर कॉंग्रेसचा उमेदवाराच्या गळ्यात विजयी माळ पडली होती.
दरम्यान, राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना-कॉंग्रेस एकत्र सत्तेत आहे; मात्र तालुक्यात कॉंग्रेस-शिवसेनेचे “सख्य’ सर्वश्रुत आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी भवितव्य ठरणार? की शिवसेना राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील निवडणुकीत कॉंग्रेसचे दत्ता झुरुंगे यांनी सुदामराव इंगळे यांचा पराभव केला होता. त्यावेळी शिवसेनेकडून ऍड. शिवाजी कोलते यांना उमेदवारी दिली होती. हीच उमेदवारी सुदामराव इंगळे यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती.
शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बलाढ्य उमेदवार उभा केल्यानेच इंगळे यांचा परभव झाला असल्याची चर्चा होती. याचा वचपा सुदामराव इंगळे यांनी विधानसभेमध्ये शिवतारे यांचा पराभव करून काढला असल्याची देखील चर्चा काहीकाळ तालुक्यात होती.
एकेकाळचे सुदामराव इंगळे याचे जवळचे मित्र म्हणून विजय शिवतारे यांचे नाव घेतले जात असे. पुरंदरमध्ये शिवतारे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या ओळखी सुदामराव इगळे यांनी करून दिल्या होत्या, अशी देखील चर्चा होती; परंतु शिवतारे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर ते दोनवेळा विधानसभेला शिवसेनेकडून निवडून आले.
मंत्री झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले. यातच बेलसर- माळशिरस गटात देखील त्यांनी लक्ष केंद्रीत करून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पिसर्वे येथील ऍड. शिवाजी कोलते यांना उमेदवारी दिली. हीच उमेदवारी इंगळे यांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती.
याचा वचपा काढण्यासाठी विधानसभेला संजय जगताप व सुदामराव इंगळे यांचे मनोमिलन झाल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली. शिवसेनेचे उमेदवार शिवतारे यांचा पराभव करण्यासाठी सुदामराव इंगळे यांनी मोठी ताकद पणाला लावली होती.
यामध्ये संजय जगताप यांना निवडून आणण्यात मोठा सहभाग हा इंगळे यांचा होता चर्चा तालुक्यात होती; परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कोण कोणाशी आघाडी करणार की बलाढ्य पक्ष स्वबळावर लढणार, याकडे लक्ष लागले आहे.
भाजपही ताकद आजमावणार
बेलसर-माळशिरस गटामध्ये भाजपच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्याचे काम पक्षसंघटनेकडून करण्यात येत आहे. तालुक्यातील पहिली शाखा ही खानवडी येथे काढून पक्ष संघटना वाढविण्याचे काम गंगाराम जगदाळे हे करीत आहेत.
त्यामुळे यावर्षी भाजपाची ताकद ही बेलसर माळशिरस गटांमध्ये वाढणार की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर भाजपने स्वबळाचा नारा दिला असल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये उमेदवार उभे करून आपली ताकद आजमावणार आहेत. भाजपची उमेदवारी राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तृळात सुरू आहे.