Apple Farming In Heat : असे मानले जाते की सफरचंदाची लागवड फक्त थंड हवामान असलेल्या ठिकाणीच केली जाऊ शकते. पण असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी उष्ण ठिकाणी सफरचंदाची लागवड करून हे सिद्ध केले आहे की, मेहनत केली तर कोणत्याही ठिकाणी काहीही पिकवता येते. शेतकरी रवींद्र नायक यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उष्ण वातावरनाच्या ठिकाणी देखील सफरचंदाची यशस्वी शेती केली आहे.
झारखंडमधील रांची, धनबाद, बोकारो आणि जमशेदपूर येथे सफरचंद लागवडीची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. ओडिशातील जाजपूरमधील शेतकरी रवींद्र नायक यांनी सफरचंदाची यशस्वी लागवड केली आहे. तेही थंड हवामान नसलेल्या प्रदेशामध्ये. | Apple Farming In Heat
जाजपूर येथील शेतकरी रवींद्र नायक हे दुखलापटना गावात राहतात आणि सध्या फळांची लागवड करून चांगले पैसे कमवत आहेत. त्यांच्या बागेत गेल्यावर हिमाचल किंवा जम्मू-काश्मीरमधील सफरचंदाच्या बागेत पोहोचल्याचा भास होतो. बागेत असलेली सफरचंद झाडे फळांनी भरलेली असतात. बागेत येणाऱ्या पर्यटकांना सफरचंदामुळे नाही तर उन्हाळ्यातही ही फळे पिकवली जातात म्हणून आश्चर्य वाटते. | Apple Farming In Heat
भाजीपाला शेती सोडण्याचा निर्णय
रवींद्र यांनी 2022 मध्ये सफरचंदाची झाडे लावली होती. त्यानंतर वर्षभरात प्रथमच झाडे फळांनी भरली. सफरचंद पिकवण्यापूर्वी ते भाजीपाल्याची लागवड करायचे. मात्र पूरग्रस्त भाग असल्याने त्यांना दरवर्षी नुकसानीला सामोरे जावे लागत होते. प्रत्येक वेळी होणाऱ्या नुकसानीमुळे निराश होऊन त्यांनी पारंपरिक भाजीपाला शेती सोडून फळांची शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी पेरू, आंबा, पपई, संत्री, लिची, थायलंड बेरी अशी फळे घेतली. त्यानंतर मिळालेल्या फायद्यामुळे त्यांना सफरचंद शेती करण्याची प्रेरणा मिळाली. | Apple Farming In Heat
वर्षाला पाच लाखांची कमाई
यानंतर रवींद्र यांनी ऍना आणि गोल्डन डोरसेट विशेष जातीच्या सफरचंदांची 60 रोपे खरेदी केली. व्यवस्थित काळजी घेतल्यास सफरचंदाची ही प्रजाती उष्ण वातावरणात देखील येते. या जातींचे वैशिष्ट्य म्हणजे ते उष्ण हवामान सहन करू शकतात. 2022 मध्ये त्यांनी सफरचंदाची झाडे लावली. त्यानंतर 2023 पासून त्यांना फळे मिळू लागली. मात्र, जेव्हा त्यांनी सफरचंदाची लागवड सुरू केली तेव्हा उष्ण वातावरणात सफरचंदाची लागवड करता येत नाही, असे म्हणत लोकांनी त्यांची खिल्ली उडवली. या सर्व गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि आज त्यांना त्यांच्या निर्णयाचा अभिमान आहे. आज ते सफरचंद विकून दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत.