पिंपरी, दि.15 – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखरगाठींना विशेष महत्त्व असते. या दिवशी साखरगाठी घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु, वाढत्या महागाईमुळे याच साखरगाठींच्या किमतीत 30 ते 40 टक्के वाढ झाली असून गोड साखरगाठींना महागाईची किनार लागली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे विशेष महत्त्व आहे. होळीनंतर येतो तो चैत्र पाडवा. चैत्र पाडवा अर्थात मराठी नववर्षाचे स्वागत घरोघरी गुढी उभारून केले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखरगाठीचे मोठे महत्व असते. आकाशात उंच गुढी उभारून त्याला साखरगाठी बांधली जाते. करोनाच्या काळात दोन वर्षे पिंपरी चिंचवड शहरातील मजूर आपल्या गावी गेल्याने अद्याप काहीजण परत आलेच नाही. त्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत असून साखर आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा साखरगाठीच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. सध्या 100 ते 110 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. तसेच कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने या वर्षी साखर गाठ्यांच्या भावात वाढ झाली आहे.
होळीचा सण झाला की, साखरगाठ्या बनविण्याच्या कामाला वेग येतो.
पिंपरी कॅम्पात साखरगाठी बनविण्याचा कारखाना असून येथे गुजरात, उत्तरप्रदेशातून मजूर कामासाठी येतात. पूर्वीचे काही मजूर गावी गेले, ते अद्याप परत आलेच नाही. तसेच त्या मजुरांकडून काम करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे मजुरीत वाढ झाली आहे. तसेच साखरेच्या दरातही वाढ झाल्याने साखरगाठीच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे.
साखरेच्या दरातही वाढ
साखरेच्या दरातही गेल्या वर्षभरात वाढ झाली आहे. किरकोळमध्ये 38 ते 40 रुपये प्रतिकिलो साखर विकली जाते. या पर्वी 33 ते 35 रुपये होती. गेल्या वर्षभरात साखरेच्या दरात वाढ झाली असून इंधन, साखर पावडर, दोरा, दूध या कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे साखरगाठींच्या दरातही वाढ झाली आहे.
मजुरांचा तुटवडा
लॉक डाऊनच्या काळात गावी गेलेले मजुरांपैकी काहीजण अद्याप परत आलेच नाही. त्यामुळे मजुरीचा प्रश्न गंभीर आहे. वाढीव दर देऊनही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे उपलब्ध मजुरांकडून काम करून घ्यावे लागत आहे. तसेच दोन वर्षे मागणीही नव्हती. त्यामुळे साखरगाठी मर्यादीत बनवण्यात आल्या होत्या.