माणसाला भाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्काने मिळाल्या आहेत. माणूसच भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा निर्माता आहे. साहित्याच्या आरशात संस्कृतीचा चेहरा दिसत असतो. संस्कृती गतिशील आणि परिवर्तनशील असते. हजारो वर्षात मुंग्याची वारूळे चिमण्यांची घरटी बदलली नाहीत. बदल करण्याचे सामर्थ्य माणसातच असते. पज्ञानशक्तीमुळे माणसाची भाषा, घर, संस्कृती बदलली.
परिवर्तनाचे सामर्थ्य हे विचारांमध्ये असते. विचार करणे माणसाच्या हातात असते. माणसाचे हात कधी विध्वंस करतात तर कधी याच हातांना नवनिर्मितीचा ध्यास असतो. या हातातूनच सुंदर शिल्प आणि सकस साहित्य निर्माण होते. संस्कृतीची सुवासिक फुले निर्माण करण्याचे हात ज्यांना लाभतात ते संस्कृतीचे निस्सिम उपासक असतात.
साहित्यिक हे संस्कृतीचे भाष्यकार असतात. त्यांच्या नजरेला जे वास्तव दिसते तेच त्यांच्या प्रतिभेतून कागदावर उतरते. सध्या विदारक वास्तवाला सामोरे जाताना सामान्य माणूस विस्कटून जातो आहे. बिथरतो आहे.काळ मोठा व्यामिश्र आणि गुंतागुंतीचा झाला आहे. सध्याचा काळ हा मोठ्या संक्रमणाचा आहे. सत्य संभ्रमित झाले आहे. आपण सत्यमेव जयते म्हणतो, पण सत्याचा विजय होण्यापेक्षा विजयी होईल त्याला सत्य म्हणावे लागते आहे.ही सत्याची शोकांतिका आहे.
जीवनाचे अंतिम सत्य काय आहे ? जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसांच्या हातात नाहीत. हातात आहे ती एकच गोष्ट ..ती म्हणजे आयुष्य.ते आपण कोणती मूल्य घेऊन जगतो याच्यावर आयुष्याची लांबी, रुंदी, उंची अवलंबून असते.
सांप्रत विज्ञान युगात माणसापेक्षा यंत्र प्रभावी झाले आहे. समाजात सदगुणापेक्षा दुर्गुणांची श्रीमंती वाढते आहे. सजग आणि संवेदनशील लेखक कवी हे समाजाचे वास्तव चित्र आपल्या साहित्यातून मांडत असतात. समाजाच्या स्थिती गती आणि समस्यां बद्दलची आपली अनुभूतीच ते व्यक्त करीत असतात. उत्कृष्ट साहित्य हे स्वकालीन समाजातील गुंतागुंतीचे, ताणतणावांचे, माणसा माणसातील अंतर संबंधाचे चित्र रेखाटत असतात. ते सामाजिक प्रश्नांना निर्भयपणे भिडत असतात.
श्रेष्ठ साहित्य प्रश्नांची तयार उत्तरे देण्यापेक्षा ते वाचकांना थेट प्रश्नांना भिडवते. युगतत्त्वाचे भान असणारे साहित्य लोककल्याणाच्या उर्मीतून जन्माला येते. ते अजरामर आणि लोकप्रिय होते. साहित्य वाचकांना काय देते.. एखादे सुंदर चित्र नेत्रानंद देते, सुरेल गाणे कर्णानंद देते. तसे उत्कृष्ट साहित्य आत्मानंद देते.
आत्मा हाच सात्विक शक्तीचे उगमस्थान आहे. आत्मशक्तीच्या विकासासाठी साहित्य,कला, संस्कृतीच्या संस्काराची गरज असते.वैज्ञानिक प्रगतीचे स्वागत करताना आपण अध्यात्मापासून वंचित राहिलो तर आपल्या जीवनसौंदर्याची मोठी हानी होवू शकते.ही हानी टाळण्यासाठीच ग्रंथांची साथ संगत जोपासली पाहिजे.
आज आपण पाहतो एका बाजूला सात्विकता, संयम सेवा,समर्पण, प्रेम अशा उदात्त मूल्यांचे दर्शन घडवणारी साहित्य संपदा असते. तर दुसऱ्या बाजूला भडक करमणुकीमुळे मानसिक संतुलन बिघडून टाकणाऱ्या चित्रविचित्र मालिका,चित्रपट असतात. युट्युब,फेसबुक आणि बरेच काही, यात माणूस नको. कान आणि डोळे गहाण ठेवल्यामुळे त्याची चिंतन प्रक्रिया बरीच थंडावली आहे .
साहित्याच्या वाचनातून मनन प्रक्रियेला एक प्रकारची गती मिळते. एकाजागी बसून जी करमणूक होते. ती शरीराला हानिकारक असते. ग्रंथाची साथ संगत आत्मिक उन्नतीला पोषक असते. जीवन सुखी समृद्ध उत्तम करण्यासाठी उत्तमोत्तम ग्रंथाच्या संगतीत आले पाहिजे.
डॉ. यशवंत पाटणे