पुणे – राज्यातील अंमली पदार्थ पुरवठ्याची साखळी पोलिसांना मोडून काढायची आहे. यामुळे कारवाई करताना पोलिसांकडून ठोक विक्रेता, किरकोळ विक्रेता आणि पेडलर यांना टार्गेट केले जाणार आहे. अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यावर पोलिसांचा भर असेल, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.
रजनीश शेठ म्हणाले, “राज्यभरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. पुणे पोलिसांकडून करण्यात येणारी कारवाई त्याचाच एक भाग आहे. अंमली पदार्थ पुरवठा विक्रेत्यांची साखळी मोडून काढण्याचा आमचा उद्देश आहे. यामुळेच आम्ही या क्षेत्रातील ठोक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना टार्गेट करुन कारवाई करत आहोत. या “टार्गेटेड’ कारवाईमुळे अंमली पदार्थांचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागत आहे.
पुणे पोलिसांनीही मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. व्यसनी व्यक्ती किंवा ग्राहकांवर कारवाई करण्यात वेळ घालवल्यास हाती किरकोळ प्रमाणात अंमली पदार्थ सापडतात. बड्या विक्रेत्यांवर कारवाई केल्यास त्यांची पुरवठा साखळी तुटते.’
प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन
सायबर गुन्ह्यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस चांगले काम करत आहे. यासाठी पोलिसांना नियमित प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच अत्याधुनिक सॉफ्टवेअरही दाखल झाले आहे. गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सायबर पोलीस स्टेशन आणि एक सायबर युनिट स्थापन करण्यात येणार आहे. गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अनेक अडचणी येत असतात. यासाठी त्या प्रक्रियेवर भर देण्यात येणार असल्याचे रजनीश शेठ यांनी सांगितले.