मुंबई – शेअर बाजार निर्देशांक विक्रमी पातळीवर असूनही आशावादी गुंतवणूकदारांकडून खरेदी चालूच आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 145 अंकांनी वाढून 55,582 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 33 अंकांनी वाढून 16,563 या महत्त्वाच्या पातळीवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, टाटा स्टील या बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. मात्र मारुती, बजाज ऑटो, पावर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
याबाबत रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, मुख्य निर्देशांकात वाढ होत असली तरी छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव मात्र घसरत आहेत. त्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅपवर दबाव कायम आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज आर्मकोबरोबर व्यवहार अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात असल्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ झाली. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असल्यामुळे धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या किमती वाढत आहेत. भारतामध्ये जरी सकारात्मक परिस्थिती असली तरी जागतिक बाजारात मात्र निर्देशांक मंद गतीने प्रवास करीत आहेत.