नवी दिल्ली- प्रख्यात टाइम मॅगेझिनने शंभर प्रभावशाली व्यक्तींची यादी गेल्या आठवड्यात जाहीर केली. त्यात पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य जागतिक नेत्यांची नावे असणे अपेक्षितच होते. मात्र एक नाव असे होते की ज्यामुळे खरेच वाचकांची नजर त्या नावावर स्थिरावली. ते नाव होते आयुष्मान खुरानाचे.
आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून समाजावर चांगल्या अर्थाने प्रभाव पाडणारा व्यक्ती म्हणून यात आयुष्मानचे नाव समाविष्ट करण्यात आले. याच आयुष्मानबद्दल आता त्याच्या एका शिक्षिकेने त्यांच्या काही आठवणी मांडल्या आहेत. यशस्वी होणे आणि माणुसकी जपतानाच त्या यशाची हवा डोक्यात जाउ न देणे या दुर्िर्मळ गुणांमुळेच आयुष्मान आज येथपर्यंत पोहोचला असल्याचे त्याच्या शिक्षिकेने म्हटले आहे.
आयुष्मान एकेकाळी आपला विद्यार्थी होता याचा सार्थ अभिमान व्यक्त करताना प्रा. अर्चना आर. सिंग म्हणतात की, एकदा त्यांचा स्टडी टूर होता. सगळ्या विद्यार्थ्यांना घेउन त्या दिल्लीला आल्या होत्या. विविध माध्यमगृहांना भेटी देण्याचा तेव्हा कार्यक्रम सुरू होता. रोडीज या शोचा विजेता आयुष्मानही त्यात होता. मात्र तो इतका लोकप्रिय असेल याची तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती.
दूरदर्शन केंद्रावर जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तेथील मुलींमध्ये आयुष्मानबद्दल कुजबूज सुरू होती. ते चकित करणारे होते. तेव्हा या मुली तुला कशा ओळखतात असा प्रश्न मी त्याला विचारल्यावर किंचितसे हास्य करत मॅम माझा शो खूप पॉप्युलर असल्याचे उत्तर त्याने दिले. त्याच्या त्या उत्तरात गर्वाची किंचितशीही छटा नव्हती. त्याने हे यश अगदी सौम्यपणे कोणताही बडेजाव न करता स्विकारले होते.
नंतरच्या प्रवासात पुढे गेल्यावरही तो तसाच राहीला. शिक्षक दिनी आम्हाला मेसेज पाठवणे, आमचा मीडिया फेस्टिव्हल प्रमोट करण्यासाठी मदत करण्याची केलेली विनंती असो वा विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश पाठवण्याची त्याला गळ घातली असो किंबहुना एकदा जेव्हा शक्य असेल तेव्हा येउन जा, एकदा गिटार वाजवून दाखव अशी कोणतीही विनंती त्याला केल्यावर त्याने कधीच आढेवेढे घेतले नाही. आमच्या पंजाब युनिव्हर्सिटीच्या रेडीओसाठी रेकॉर्डींग करण्यासही त्याने कधी ना केली आहे.
आयुष्मानचा हा साधेपणाच त्याचे गुणवैशिष्ट्य आहे. काही जण याला चांगले पीआर म्हणत असतील, पण आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्वाचाच तो एक भाग वाटतो असेही अर्चना सिंग यांनी म्हटले आहे.