लखनऊ – अयोध्येमध्ये १९९२ साली बाबरी मशिद उद्ध्वस्त केल्याप्रकरणी सर्व आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह अन्य आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी तब्बल २८ वर्षानंतर हा ऐतिहासिक निकाल दिला.
बाबरी मशिद उद्ध्वस्त प्रकरणावरील महत्वपूर्ण निर्णयाबरोबर न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव निवृत्त होणार आहे. या निर्णयासाठी त्यांच्याकडे आज ५ वाजेपर्यंत वेळ होता. आजच त्यांचा कार्यकाळ संपणार आहे
सुरेंद्र कुमार यादव यांचे अयोध्यासोबत जुनेच नाते आहे. त्यांची पहिली नियुक्ती अयोध्येतच झाली होती. त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर २०१९ रोजीच समाप्त झाला होता. परंतु, बाबरी मशिद उद्ध्वस्त प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी तसेच यावर निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षाची मुदत वाढवून दिली होती.
दरम्यान, विशेष सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीश एस.के. यादव यांनी १६ सप्टेंबर रोजी बाबरी मशिद उद्ध्वस्त प्रकरणी ३२ आरोपींना सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्याशिवाय विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांचा समावेश आहे. उमा भारती आणि कल्याण सिंह यांना करोना विषाणूची लागण झाली असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. राम मंदिर उभारणीसाठीच्या प्रभारी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हेही आरोपींमध्ये आहेत. सुनावणीवेळी साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत १८ आरोपी कोर्टात उपस्थित होते तर अडवाणी यांच्यासह काही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत निश्चित केली होती. मात्र सीबीआय न्यायालयासाठी ही मुदत महिन्याभराने वाढवण्यात आली त्यानंतर दैनंदिन सुनावणी सुरू केली गेली.
सीबीआयने ३५१ साक्षीदार आणि पुरावा म्हणून ६०० कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केले आहेत. ४८ जणांवर आरोपपत्र दाखल केले गेले. मात्र खटल्यादरम्यान १७ जणांचा मृत्यू झाला आहे.