नाशिक – आज राज्यभर श्री गणेश विसर्जन मिरवणुका सुरु आहेत. वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र अशातच अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील युवक बाप्पाचे विसर्जनादरम्यान वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राज उमेश वाघ (रा. शिरवाडे वणी, ता. निफाड) असे वाहून गेलेल्या तरूणाचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी बेपत्ता युवकाचा रात्री उशीरापर्यंत शोध घेतला मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह व पावसामुळे युवकाचा तपास उशिरापर्यंत लागला नाही. या घटनेनंतर विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिरवाडे वणीगावाजवळील पाचोरे वणी येथील नेत्रावती नदीत काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणूका उत्साहात सुरु आहेत. अनेकजण बाप्पाला दहाव्या दिवशी तसेच काही जण दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवसानंतर बाप्पाला निरोप देतात. निफाड तालुक्यातील काही गणेश मंडळांनी नवव्या दिवशी बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीचे आयोजन केले होते. वाजत गाजत मिरवणूका झाल्या. मात्र यादरम्यान विसर्जनाला गालबोट लावणारी घटना घडली. गणेश विसर्जन करणअयासाठी पिंपळगाव बसवंत -चांदवड मार्गावरील शिरवाडे वणी येथीर राज वाघ हा पाचोरे वणी परिसरात नेत्रावती नदीतीरी गेला होता.
यावेळी विसर्जन सुरु असताना अचानक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाय घसरून नदीत पडला. मात्र गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात पाऊस सुरु आहे. नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे राज वाघ हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. तो वाहून जात असल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र तो सापडला नाही. तात्काळ चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन व पिंपळगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवान बेपत्ता युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह व पावसामुळे युवकाचा तपास उशिरापर्यंत लागलेला नव्हता.
विसर्जना दरम्यान घ्या काळजी –
आज राज्यभरात गणपती विसर्जनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच गणेश विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. सर्वच विसर्जन ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर कृत्रिम तलावांची सुविधा देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी नदीपात्रात उतरू नये, काळजीपूर्वक विसर्जन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणूकीत आक्षेपार्ह गाणं वाजवणं भोवलं; चौघांवर गुन्हा दाखल –
राज्यभरात गणेश विसर्जन सुरु असून मिरवणूकीदरम्यान अनेक ठिकाणी डीजे विरहित मिरवणूका काढल्या जात आहे. मात्र बहुतांश ठिकाणी डीजेचा दणदणाट ऐकायला मिळत आहे. त्यातही त्यावर विचित्र गाणी वाजवली जातात. अशा मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. दरम्यान लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात मिरवणूकीदरम्यान डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवल्याने मंडळाच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी उदगीर शहरातील सर्व गणेश मंडळांनी गणरायांची मिरवणुका काढून वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका मंडळाने डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवले. याप्रकरणी संबंधित गणेश मंडळाच्या चार पदाधिकाऱ्यांवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीरमधील गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे लावण्यास बंदी होती. तरी देखील मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मिरवणूकीदरम्यान डीजेचा वापर करण्यात आला. कर्कश्श आवाजात आक्षेपार्ह गाणे वाजविण्यात आले. याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्याकडून संपूर्ण जिल्हाभर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. शहरातील चौबाऱ्याकडून कॉर्नर चौकाकडे जाताना निलंगे लाईट डेकोरेशनच्या समोर सार्वजनिक रोडवर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत असताना काही तरुण पोलिसांना मिळून आले. त्यामुळे यावरून पोलीस नाईक राजीव सीताराम कट्टेवार यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीजेच्या असह्य आवाजामुळे सांगली जिल्ह्यात दोघांचा मृत्यू –
गणपती विसर्जन मिरवणूकीत डीजेच्या आवाजाने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठेएकंद आणि वाळवा तालुक्यातील दुधारी येथे घडली आहे. शेखर पवाशे (वय 32, रा. कवठेएकंद) आणि प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी) अशी डीजेच्या असह्य आवाजामुळे ह्रदयविकाराच्या त्रासाने मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दुधारी येथील प्रवीण यांचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. सोमवारी सायंकाळई सात वाजताच्या सुमारास ते कामावरून घरी परतले. घरी परतताना रस्त्यात त्यांची दुचाकी बंद पडली. त्यामुळे त्यांना काही अंतर ढकलत दुचाकी आणावी लागली. घरी पोहोचताच परिसरात सुरु असलेल्या गणपती विसर्जन मिरवणूकीत ते सहभागी झाले. काही वेळ त्यांनी मित्रांसोबत मिरवणूकीत नाचण्याचा आनंद घेतला. मात्र काही वेळाना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. चक्कर येऊन खाली पडले. उपचारासाठी त्यांना तातडीने इस्लामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचाराआधीच डाॅक्टरांना मृत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत कवठेएकंद येथील शेखर हा देखील गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाला होता. विशेष म्हणजे 10 दिवसांपूर्वीच त्यांची प्लॅस्टिक सर्जरी झाली होती. तरी देखील ते मिरवणूकीत सहभागी झाले होते. मिरवणूकीत मोठे साऊंडच्या आवाजाने त्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. ते घरी परतले. घरी येताच भोवळ येऊन खाली पडले. तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डाॅक्टरांना मृत घोषित केले.
शेखर पावशे यांचे पलूस येथे चारचाकी वाहने दुरुस्तीचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची एक मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. ऐन उमेदीत तरुणाचा नाहक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, साऊंडच्या मोठ्या आवाजामुळे अनेकांना त्रास होत असतो त्यामुळे अनेक ठिकाणी डीजे विरहित मिरवणूकीचा निर्णय घेतला जातो. तरीही बहुतांश ठिकाणी डीजे सर्रास वाजवले जातात. त्यांचा एवढा मोठा आवाज असतो की, त्याचा परिसरातील वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, ह्रदयविकाराचे रुग्ण यांना मोठा त्रास होतो. अनेकांना मृत्यूला देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे गणपती मंडळांनी डीजे विरहीत मिरवणूका काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डीजे ऐवजी पारंपारिक वाद्ये, ढोल, ताशा अशा वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढावी. जेणेकरून आपल्या आनंद घेण्याच्या नादात कोणाचा नाहक मृत्यू होऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते.