– अरुणा सरनाईक
सध्या विवाहाचे बदलतं स्वरूप आणि भविष्यातील विवाह बदलाचा धांडोळा घेणारा लेख.
विवाह हे एक पवित्र बंधन आहे. साताजन्माचं अतूट नातं! पवित्र्याचं! जबाबदारी, सामाजिक बांधिलकी असे अनेक पदर या विवाहाच्या नात्याला, भरजरी वस्त्राला आहेत. विवाह म्हणजे दोन मनांचे मीलन, दोन कुटुंबांची एकत्रता असते. केवळ मुलगा-मुलगी या बंधनात बांधले जात नाहीत; तर दोन कुटुबांची आपसात घट्ट मैत्री होत असते. जगामध्ये फार थोड्या देशांमध्ये विवाहसंस्था, कुटुंब या संकल्पना आहेत. त्यामध्ये आपला देश पहिल्या स्थानावर असावा किंवा आहे असं म्हणूया! पूर्वी आपल्या जातीत, बरोबरीत, प्रांतात लग्नसंबंध जोडले जात असत.
अगदी बालवयात विवाहही होत असतं! त्यामुळे मुली अगदी लहानपासून सासरी वळणात वाढत. आईपेक्षा सासूबाई जास्त जवळच्या वाटत. काही काही वेळा तर मुलीच्या केसांचे वळण, विचार, राहणी ही तिच्या आईपेक्षा सासूशी साधर्म्य दाखवित असे. नेसणं सवरणं सर्व काही सासरचे (अर्थात सासूबाईंसारखे) असे. जणूकाही त्याच मायलेकी आहेत. फार जुना काळ नाही हा! 50-60 वर्षांपूर्वीचा असावा. एकत्र कुटुंबसंस्था होती. 25-30 माणसांचा परिवार होत असे.
आतेघरी एक तरी मुलगी नांदत असे. त्यात दोन्हीकडून फायदा होता. एकतरी सून आपल्या भावाची मुलगी असावी, असा आग्रह धरला जायचा. सणवार, उत्सव साग्रसंगीत साजरे होत असत. केवळ भारतात नाही तर युरोप, इंग्लंड, बेल्जिअम, जर्मनी या देशांमध्ये आजही विवाहाला आणि एकत्र कुटुंबाला आदराची मान्यता आहे. विवाहामुळेच कुटुंबसंस्था आजही टिकून आहे. यामुळेच नातेसंबंध मानसिक स्वास्थ्य अजूनही आहे.
अगदी राजेमहाराजे यांच्या काळापासून स्त्रियांना आपला सहचर निवडण्याचे स्वातंत्र्य होते, याची आपल्या पुराणात, इतिहासात उदाहरणे सापडतील. स्वयंवर पद्धती अस्तित्वात होती. गांधर्वविवाह, राक्षसविवाह असे अनेक प्रकारचे विवाह अस्तित्वात होते. गांधर्वविवाहाचे प्रसिद्ध उदाहरण दुष्यंत शकुंतला होय. राक्षसविवाह म्हणजे एकतर्फी प्रेमाचा आविष्कार; पण तोही मान्य होता.
युगं लोटली आणि आता सत्यकथा उरल्या. काळानुसार विवाह पद्धती बदलत गेल्या. परकीय आक्रमणे झाली. इंग्रजाचे राज्य आले. स्त्री पडद्यात गेली. मनाविरुद्ध लादलेल्या विवाहाला बळी पडली. काही राजकारणं विवाहाच्या मांडवात शिजू लागली. आज विवाहाचे स्वरूप पालटत आहे. काळानुसार प्रत्येक संकल्पना बदलत गेल्या आहेत. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव. पण म्हणून विवाह परंपरेत झालेला प्रत्येक बदल चांगलाच आहे, असे आपण म्हणू शकत नाही. बदल अपरिहार्य जरूर आहेत. पण भावना बदलायला नकोत. तेच नेमकं आज सर्वत्र दिसून येत आहे.
मधल्या काळात विवाह अगदी थोडक्या दिवसात होत असे. म्हणजे दोन दिवस किंवा तीन दिवस! घरोघरी लग्नाची अक्षता, आमंत्रण जात असे. गरीब श्रीमंत असा फारसा भेदभाव नसे. सर्वकाही घरी तयार व्हायचे. नवरी मुलगी ब्रायडल मेकअपच्या पॅकेजच्या वगैरेच्या भानगडीत पडत नसे. मुलीची आई, मावशी ह्या तर जेमतेम लग्नाच्या वेळेपावतो कशाबशा तयार होत असत. ताटापाटांची जेवणं, आसनं, पंगतीत घरच्या बायका मुली वाढीत असतं! त्यातच बरीच लग्नं जमायची आणि व्हायची.
आज मात्र लग्न ठरल्यापासून होईपर्यंत पाण्यासारखा पैसा वाहतो. आज मराठी कुटुंबातील विवाहदेखील आपले स्वरूप बदलत आहेत. लग्न ठरल्यावर पहिली धाव ब्युटीपार्लरला घेतली जाते. वाईट काहीच नाही. पण आजकाल अतिरेक होतो. मेहंदी, संगीत, कॉकटेल पार्टीज रिसेप्शन असा 8 ते 10 दिवसांचा लग्नसोहळा सर्वत्र पाहायला मिळतो. संस्कार कमी आणि बाकीच्या गोष्टी अधिक असतात.
मुलीने सासरी कसे वागावे याचा सल्ला आया-आजांनी द्यायची सोय हल्ली राहिलेली नाही. उलट मुलीच्या बरोबरीने दिसण्यात आया रमलेल्या असतात. “अगोबाई अगदी वाटत नाही. तुम्ही आई आहात? मोठी बहीण वाटता’ अशी कमेंट मिळविण्यात मुलीची आई गुंतलेली असते. वयाबरोबर वागा आणि छान दिसा असं का वाटतं नाही? बदलत्या विवाह संकल्पनेतील ही एक मोठी शोकांतिका आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न किती दिवस टिकेल, हेही सांगता येत नाही.जवळपास प्रत्येक मुलीला नवऱ्याचे आईवडील खटकतात, पण आपलेही आईवडील आहेत ह्याचं भान राखलं तर खरंच चांगल आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक जरूर असावं- व्हावं; पण सर्वांना धरून राहावं. मागील दोन वर्षांपासून विवाह संकल्पना अजूनच बदलली आहे. जमावबंदी, सोशल डिस्टन्सिंग यामुळे लग्नांमध्ये आमंत्रिताची संख्या रोडावली जरूर. पण कार्यक्रम मात्र कमी झाले नाहीत. हौसेला मोल नाही, हेच खरचं! करोनाने मात्र खूपच बदल घडून आला.
यात एक गंमत अशी की आपण कोणाच्या खूप जवळचे आहोत की नाही! ह्याचा शोध प्रत्येक जण घेऊ लागलाय! टीव्हीवरील मालिकांनी या लग्नसंस्थेत अधिकच भर घातली आहे. किती प्रकारांनी लग्न होऊ शकतात, त्याचप्रमाणे कशाप्रकारची विघ्न येऊ शकतात हे या मालिकांनी दाखवून दिलं! एकंदर मज्जा आहे. काळानुसार संकल्पना बदलली आहे. त्यातील काही बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत, यात शंकाच नाही. शेवटी काय तर कालाय तस्मै न:!