– अपर्णा देवकर
यशस्वी होताना आयक्यू (इंटेलिजेंट कोशंट) जितका महत्त्वाचा तितकाच तुमचा ईक्यू (इमोशनल कोशंट)ही महत्त्वाचा आहे, असं आता समोर येऊ लागलं आहे.
मन आणि बुद्धी याबाबतचे भांडण जुनेच आहे. मनाचं ऐकायचं की बुद्धीने काम करायचं हे गणित भले भले सोडवू शकत नाहीत. आजवर तर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर मनाच्या रस्त्याने न गेलेलंच चांगलं असं मानलं जात होतं, पण काळाबरोबर गणितही बदलतात. कॉर्पोरेट क्षेत्रात तर मनाला फारसं स्थान दिलं जात नव्हतं पण आता केवळ व्यवहारी निर्णयांना महत्त्व उरलेलं नाही तर त्याला भावनेचा ओलावाही दिला जाऊ लागला आहे. नेमकं हेच कारण या क्षेत्रात पुढे येऊ पाहणाऱ्या महिलांसांठी वरदान ठरत आहे. आजवर महिलांना मोठ्या पदांवर किंवा जबाबदारीची कामं केवळ या कारणासाठी दिली जायची नाहीत की त्या भावनेच्या बळावर निर्णय घेतात. पण आता आयक्यू इतकाच ईक्यूही महत्त्वाचा ठरू लागला आहे. निर्णय घेताना तुम्ही मानसिकरित्या किती खंबीर आहात किंवा भावनेचा त्यात काय वाटा आहे यावर आता यशस्वीतेची गणितं बांधली जाऊ लागली आहेत.
म्हणूनच महिलाही आता त्यात आपल्या या गुणाचा उपयोग करू शकतात. यशस्वी होण्यासाठी केवळ कागदावरचे आकडे आणि प्रगतीचे आलेख हीच आता परिमाणं होऊ शकत नाहीत. त्याबरोबरच तुम्ही लोकांच्या भावना किती चांगल्याप्रकारे समजू शकता आणि त्यानुसार तुमचा व्यवहार कसा ठेवता यालाही महत्त्व प्राप्त झालं आहे. ही गोष्ट तर स्त्रियांना निसर्गानेच वरदान दिल्यासारखी आहे. कुटुंबाचा तोल राखताना स्त्रिया नेमकं हेच तर करत असतात. म्हणूनच तर घराची गृहिणीपदाची जबाबदारी त्या चांगल्याप्रकारे निभावून नेऊ शकतात. हीच कौशल्य त्यांना व्यावसायिक जगातही वापरायची असतात. त्या ते करतातही पण कधी कधी त्यांना कमी लेखून त्याची महती कमी केली जाते. पण आता नव्या संशोधनानुसार सफलतेची योग्य परिमाणं लावताना बौद्धिक क्षमतेइतकीच भावनिक क्षमताही महत्त्वाची ठरू लागली आहे.
कोणतीही नोकरी मिळवताना तुमचा आयक्यू कामी येऊ शकतो पण तिथे तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल तर ईक्यूच कामी येणार आहे. भावनिकदृष्ट्या तुम्ही किती संतुलित आहात याची वेगवेगळी परिमाणं असतात. ती निरनिराळ्या निकषांवर आधारित असतात. काही निकष तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यातले निर्णय कसे घेता यावरूही ठरवता येऊ शकतं. काही अगदी साधे निर्णय तुम्ही कसे घेता यावरही तुमचा ईक्यू कसा आहे याची पडताळणी करता येते. यातल्या काही नेहमीच्या परिस्थितीत तुम्ही कशा प्रतिक्रिया देता याची उत्तरं हो किंवा नाही अशी तुमच्या मनाशीच द्या. त्यात किती होकार आणि किती नकार आहेत याची फक्त नोंद करा. नंतर त्यावरून तुमचा ईक्यू कसा मोजायचा हे ठरवता येईल.
तुमच्या जोडीदाराकडून तुम्ही दुखावल्या गेलात तर खूप दु:खी होऊनही ही गोष्ट तुम्ही इतरांपासून लपूवन ठेवता का? तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण काही बोलण्याआधी तिच्या चेहऱ्यावरून तिला काहीतरी सांगायचं आहे हे तुम्हाला कळतं का? जेव्हा काहीतरी वाईट घडत असतं तेव्हा ते बदलण्याची जबाबदारी आपली आहे असं तुम्हाला वाटतं का? जेव्हा तुम्ही कोणत्यातरी चिंतेत असता तेव्हा रात्री खूप वेळ झोप येत नाही का? काहीतरी मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहण्यावर तुमचा विश्वास आहे का? एखाद्या चित्रपट किंवा पुस्तकाचा प्रभाव तुमच्यावर अधिक पडतो का? लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील याचा तुम्ही सतत विचार करता का? तुम्ही कोणत्याही प्रसंगी तुमच्या कौशल्याने उत्साह आणि आनंद यांची पखरण करू शकता याचा तुम्हाला विश्वास आहे का? खरेदी करताना जास्त बार्गेनिंग करणं तुम्ही पसंत करत नाही, हे माहीत असून की त्यामुळे थोडे पैसे वाचू शकतात.
कोणतीही गोष्ट सरळ स्पष्ट सांगायला तुम्ही घाबरता का? एखाद्या वाद-विवादाच्या प्रसंगी तुमचा मुद्दा बरोबर असतानाही केवळ कटूता येऊ नये म्हणून तुम्ही माघार घेता का? एखादा निर्णय घेतल्यावर तो बरोबर की चूक याचा विचार तुम्ही करता का? सुट्टीत काय करायचं याचे नवनवे विचार तुम्ही करता का? खास समारंभ किंवा सणासाठी त्याप्रमाणे तयार होता का? व्यवसाय किंवा काम नीट होत नसेल तर ती भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे असं तुम्हाला वाटतं का? कितीही चांगलं काम केलं तरी बॉस तुमच्याकडून आणखी कामाची अपेक्षा करतो का? तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याबद्दल जास्त अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं का? थोडा तणाव आणि श्रम झाल्याने फारसं काही बिघडत नाही असं तुम्हाला वाटतं का? तुमची अत्यंत वैयक्तिक गोष्टही तुम्ही तुमच्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीबरोबर शेअर करू शकता का?
आता तुमचा स्कोर पाहूया. 16 पेक्षा अधिक हो उत्तरं असतील तर तुमचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे. भावनांच्या तीव्र तडाख्यातही तुम्ही संतुलन कायम राखू शकता. त्यामुळे इतरांशी चांगले संबंध ठेवणं तुम्हाला शक्य होतं. मात्र हे कायम ठेवण्यासाठी दूरदर्शिता, कठोर परिश्रम यांचीही आवश्यकता आहे हे लक्षात असू द्या. जर तुमचा स्कोर 7-15 च्या दरम्यान असेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या आणि स्वत:च्या भावनांचा आदर करणाऱ्या व्यक्ती आहात असं मानायला हवं. पण कधी कधी भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी तुम्ही भावनांचा आदर करत नाही आणि ती सुखं प्राप्त करूनही त्याचा उपभोग घेत नाही असं होऊ शकतं. त्यामुळे आपल्या वास्तविक गरजा काय आहेत याचा विचार करून निर्णय घेणं योग्य ठरेल.
जर तुमचा स्कोर 6 पेक्षाही कमी असेल तर तुम्ही स्वत:बद्दल आणि इतरांबद्दलही भावनापूर्ण असण्याची गरज आहे. सामाजिक संबंध आणि कर्तव्य यांच्याकडे दुर्लक्ष होत नाही ना हे पहायला हवं. त्यामुळे तुम्ही यश मिळवाल पण त्याचा आनंद घेऊ शकणार नाही.
तुम्ही कोणत्या प्रकारच्या भावनात्मक स्थितीचं प्रतिनिधित्व करत आहात याचा अंदाज घ्या. त्यानुसार तुमच्या स्वभावात काही बदल करता येतील. या जोरावरच व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आनंदी आणि समाधानी राहण्याची किल्ली तुम्हाला मिळू शकते.