पुणे -पवित्र आषाढी वारीनिमित्त दि. 12 जून रोजी शहरात संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होणार आहे. दि. 14 मे रोजी वैष्णवांचा हा मेळा पुण्यातून पुढे प्रस्थान ठेवेल. वारी मार्गांत पुणे जिल्ह्यात 18 ठिकाणी पालखीचा मुक्काम असेल. दरम्यान, यावर्षी पाऊस उशिरा येणार असल्याने वारकऱ्यांना उन्हाच्या झळा आणि उष्णता सहन करावी लागण्याची भीती आहे.
वारी काळात वारकऱ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळावा, क्षणभर विश्रांती घेता यावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पालखी मार्गांवर 27 ठिकाणी मंडप उभारण्यात येणार आहेत. प्रशासनाने यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहे. या ठिकाणाची पाहणी करून आवश्यक असल्यास सपाटीकरण, साफसफाई केली जाणार आहे. यासाठी “सीएसआर’ आणि लोकसहभागातून मंडप उभारणीचा खर्च केला जाणार आहे. यात प्रामुख्याने संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावर चार, तर संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावर बारा ठिकाणी मंडप असतील. तसेच संत श्री सोपानकाका पालखी सोहळा मार्गावर अकरा ठिकाणी मंडप उभारण्यात येत आहेत. विसावा आणि मुक्काम या दोन्ही ठिकाणांच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला हे मंडप असतील. वारकऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी 112 वैद्यकीय अधिकारी आणि 336 कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. यासाठी 20 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
वारीसोबत आरोग्य जनजागृती
दोन्ही पालख्यांसमवेत आरोग्य चित्ररथ असतील. तसेच सर्व आरोग्य पथकांच्या ठिकाणी मोठे बोर्ड, बॅनर व फ्लेक्समार्फत आरोग्य योजनाची जनजागृती केली जाणार आहे. दिंडीप्रमुखांना 740 औषध किटचे वाटप करण्यात येणार आहे.