सातारा – करोना काळात मी स्वतः रस्त्यावर उतरून शहरात जागोजागी सॅनिटायझरची फवारणी करून घेत होतो. पालिकेत सत्ता असतानाही तुम्हाला साधं आयसोलेशन सेंटर सुरू करता आले नाही. तुमचं काम म्हणजे ‘नाव मोठं लक्षण खोटं’ आहे. कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा, मग साताऱ्यात काय चाललंय ते कळेल, असा पलटवार अशोक मोने यांनी सुहास राजेशिर्के यांच्यावर पत्रकाद्वारे केला आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, करोना काळात सर्वत्र करोना सेंटर सुरू झाली; पण पालिकेकडे निधी व जागा असतानाही साधं आयसोलेशन सेंटर सुरू केले नाही. कोण चमकोगिरी करतंय आणि कोण काम करतंय, ते नागरिक पाहात आहेत.
निवडणूक जवळ आल्याने तुमची बॅनरबाजी सुरू आहे. तुमचा प्रभाग कसा आहे, हे तरी तुम्हाला माहिती आहे का? करोना काळात सातारकरांना वाऱ्यावर सोडून तुम्ही गायब झालात. केवळ नावात राजे असून चालत नाही, त्यासाठी जनतेची सेवा करावी लागते.
ती तुम्हाला कधी जमली नाही. तुमचा बोलविता धनी कोण, हे तुमच्या पत्रकावरून सिद्ध झाले आहे. गेल्या पावणेपाच वर्षांत साताऱ्यात कसले दिवे’ लावले, याचा हिशेब देण्याची वेळ आली आहे. तुमच्या थापेबाजीला सातारकर भुलणार नाहीत.