माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी महिला सहकारी बॅंक या दोन्ही संस्थांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. महिलांना स्वतःची ओळख निर्माण करून देण्यातही मोठा हातभार लावला आहे. न्यू पनवेलच्या अभिलाषा ठाकूर यांच्या चविष्ट पदार्थांची गोडी सर्वांपर्यंत पोहचविण्यात वाटा उचलला. त्या स्वतः आर्थिक स्वावलंबी झाल्याच. शिवाय इतर महिलांनाही त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांची जिद्दच त्यांना यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरत आहेवेळेचा सदुपयोग करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. पण सर्वांनाच मार्ग मिळतो, असे होत नाही. नवीन पनवेलच्या अभिलाषा ठाकूर यांना मार्ग सापडला.
वेळ होता आणि चविष्ट खाद्यपदार्थ तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे या व्यवसायात यश मिळविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यांची भाकरी, चपाती आणि जेवणाचे डबे घरगुती स्वरूपात त्या घरातूनच पोचवू लागल्या. माणदेशीने या कामाला वेगळी दिशा दिली. आणि आता परिसरात या व्यवसायाने मोठे यश मिळविले आहे.
या व्यवसायापूर्वी अगरबत्ती तयार करणे, आयुर्वे दिक साबण तयार करणे हे व्यवसायही त्यांनी करून पाहिले. पण त्यात मिळणारे मार्जिन कमी असल्यामुळे त्यांनी केटरिंगचा व्यवसायाकडे अधिक लक्ष देण्याचे ठरविले. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतले होते. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात त्यात बारा वर्षे नोकरीही केली. मुले मोठी झाल्यावर खूप वेळ मिळू लागला. त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी चांगल्या प्रतीचे दर्जेदार व सकस अन्न ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन त्यांनी केले. सुरवातीला घरगुती स्वरूपातच हे काम सुरू झाले. त्यांच्या परिचयातील ऐश्वर्या खातू यांनी उत्पादित केलेल उटणे अभिलाषा यांनी घेतले.
त्यावेळी त्यांना माणदेशी फाउंडेशनची माहिती मिळाली. आपला घरगुती स्वरूपातील सीमित व्यवसाय वाढवायचा असेल तर माणदेशीची मदत घ्यावी असा विचार त्यांच्या मनात आला. माणदेशीशी त्यांचा संपर्क झाला आणि व्यवसायाचे स्वरूपच बदलून गेले. व्यवसायवृद्धीच्या अनेक कल्पना त्यांना मिळाल्या. मार्केटिंगचे तंत्र शिकता आले. आर्थिक नियोजन करणे शक्य झाले, पॉंम्प्लेट, बॅंनर याद्वारे लोकापर्यंत पोहचणे असेल किंवा डीजिटल मीडियाद्वारे फेसबुक किंवा व्हॉटसऍपद्वारे जाहिरातींमधून लोकापर्यंत पोहचता आले. माणदेशीकडून खूप काही शिकायला मिळाले. माणदेशीने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच व्यवसायाची प्रगती होत गेली, असे त्या सांगतात.
अन्नाचा दर्जा चांगला ठेवण्यासाटी त्या सातत्याने प्रयत्न करतात. चांगल्या प्रतीचा गहू, ज्वारी व इतर लागणारे सर्व साहित्य चांगल्याच दर्जाचे असेल हे त्या कटाक्षाने पाळतात. माणदेशीमुळे संपर्कही खूप वाढला. मागणी वाढू लागली. अगदी दोन भाकरींची ऑर्डर आली तरीही ती पूर्ण करायचीच असे ठरवून त्यांनी व्यवसायाला पुढे नेले. आज व्यवसायाचे यश दिसत असले तरी त्यामागे मोठे कष्ट आहेत, मेहनत आहे आणि दिलेला शब्द पूर्ण करण्याची धडपड आहे. त्यासाठी त्यांची रोजची कसरत असते.
पहाटे साडेपाच ते दुपारी एक आणि दुपारी चार ते रात्री साडेनऊ- दहापर्यंत ही धावपळ सुरू राहते. त्यात डबे तयार करून ते ग्राहकांना डिलिव्हर करण्यापर्यंत अनेक प्रकारचा व्याप त्या सांभाळतात.भांडी घासणे आणि इतर कामांसाठी पुन्हा रात्री एकपर्यंत वेळ द्यावा लागतो. पूर्वी त्या एकट्याच हे काम करायच्या. व्याप वाढल्याने दोन मदतनीस महिलांही त्यांच्या जोडीला त्यांनी घेतल्या आहेत. पदार्थ बनविण्याचे काम त्या घरीच करतात, त्यासाठी त्यांच्या मदतीला सहा महिला आहेत. या महिला जेवढ्या मेहनत घेतात, तेवढ्या प्रमाणात त्यांना मोबदला दिला जातो. व्यवसायाचा व्याप खूप वाढला. फक्त चपात्यांचे लक्षात घेतले तर पूर्वी त्यांना 150 चपात्या कराव्या लागायच्या. आता मागणीनुसार रोजच्या चपात्यांचा आकडा पाचशे ते आठशेपर्यंत जाऊन पोहचला आहे.
एखादे हॉटेल काढायचेही त्यांच्या मनात होते. पण बाहेर मोठे भाडे भरण्यापेक्षा घरापाशीच जागा असल्याने पीठ मळणी, पॉवर गॅस अशी मशिनरी त्यांनी तिथेच घेतली आहे. मोठ्या व्यवसायांमध्ये अशा मशीन्स साधारणतः पुरूष चालवितात. पण इथे या मशीनवर काम करून अभिलाषा या महिलांसाठी रोल मॉडेल बनल्या आहेत.आपण स्वतःच्या बळावर व्यवसाय यशस्वी करून शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. मेहनत घेतली तर कष्टपूर्वक आपण स्वावंलबी होतोच.
पण त्या मेहनतीला आणखी थोडी दिशा दिली तर स्वतःबरोबर इतरांनाही आर्थिक स्वावलंबी बनवू शकतो, हे अभिलाषा ठाकूर यांनी सिद्ध केले आहे. आपण स्वावलंबी व्हावे आणि त्यायोगे इतरांनाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, असा विचार महिला करते ही गोष्टच महिला सक्षमीकरणाला बळकटी देणारी आहे. सुरवातीला नोकरी, नंतर अगरबत्ती तयार करणे आणि आयुर्वेदिक साबण तयार करणे अशी व्यावसायिकतेची सुरवात केल्यानंतर आवडत्या क्षेत्रात काम करून त्यांनी मिळवलेले यश इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.