पिंपरी -राज्य परिवहन महामंडळाला वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड आगाराच्या मालवाहतूक सेवेतून संप काळात 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, संप निवळल्यानंतर 20 एप्रिलपासून ही सेवा पुर्ववत सुरू झाली. त्यानंतर गेल्या 19 दिवसांमध्ये एसटीला 1 लाख 74 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
संप सुरू होण्यापूर्वी मालवाहतूक सेवेतून एसटीला दरमहा सरासरी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. 20 एप्रिलपासून एसटीची मालवाहतूक सेवा पूर्ववत सुरू झाली. एप्रिल महिन्यात या सेवेतून एसटीला 1 लाख 31 हजार 108 रुपयांचे उत्पन्न मिळाले. एप्रिल महिन्यातील 11 दिवसांत एसटीच्या पाच ट्रकच्या माध्यमातून 9 फेऱ्या झाल्या. राज्यभरात 2 हजार 646 किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत मालवाहतूक करण्यात आली. एका ट्रकमध्ये दहा टनापर्यंत मालवाहतूक करण्यात आली.
मे महिन्यात 1 तारखेपासून मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. नव्या दरानुसार 200 किलोमीटरपर्यंत प्रति किलोमीटर 57 रुपये इतक्या दराने एसटीमार्फत मालवाहतूक करण्यात येत आहे. तर, 200 किलोमीटरच्या पुढे 55 रुपये प्रति किलोमीटर या दराने मालवाहतूक केली जात आहे. मालवाहतुकीसाठी एसटीच्या ट्रकमार्फत 1 ते 8 तारखेदरम्यान 4 फेऱ्या झाल्या. 772 किलोमीटर इतक्या अंतरात ही वाहतूक करण्यात आली, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.