मुंबई – वाढणारी महागाई आणि युक्रेनमधील अनिश्चित परिस्थितीमुळे शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा येत आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी त्यामुळे शेअर बाजार निर्देशांकांत घट नोंदली गेली. माहिती-तंत्रज्ञान आणि बॅंकिंग क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 104 अंकांनी कमी होऊन 57, 892 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17 अंकांनी कमी होऊन 17,304 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील 30 पैकी 11 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर 19 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
आयसीआयसीआय बॅंकेचा शेअर दोन टक्क्यांनी कोसळला. अल्ट्राटेक सिमेंट, ऍक्सिस बॅंक, इंडसइंड बॅंक, टीसीएस, एचडीएफसी बॅंक, स्टेट बॅंक, कोटक बॅंक, भारती एअरटेल या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. एचडीएफसी बॅंक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकाची मोठी हानी टळली.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक दह देवर्ष वकील यांनी सांगितले की खरेदी आणि विक्री करणाऱ्यांची संख्या आज सारखीच राहीली. त्यामुळे निर्देशांक कालच्या पातळीवर दुपारपर्यंत स्थिर होते. नंतर थोडी विक्री वाढल्यामुळे निर्देशांकांत घट झाली. महागाई आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निकालाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
त्याचबरोबर युक्रेनमधील तणाव निवळला असला तरी आणखी तेथील परिस्थिती खात्रीने सुधारल्याचे दिसून येत नाही आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून हा चिंतेचा विषय आहे. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये पाऊण टक्का घट झाली. संस्थागत गुंतवणूकदारांचे भारतातून अंग काढून घेणे चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी 1,890 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.