मुंबई – भारतातील बांधकाम क्षेत्र आगेकूच करू लागले आहे. बांधकाम क्षेत्रातील घरबांधणी क्षेत्र अधिक आशादायक असल्याचे एचडीएफसी या संस्थेचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी सांगितले.
भारतीय उद्योग महासंघाचेने रियल इस्टेट क्षेत्रावर आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये बोलताना पारेख म्हणाले की, पाश्चिमात्य देशांमध्ये गुंतवणूक म्हणून घर खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे तेथे परिस्थिती स्थिर नाही. मात्र भारतामध्ये राहण्यासाठी घर खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे हे क्षेत्र अधिक ताकदीने आगेकूच करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आता लॉक डाऊननंतर परिस्थिती निवळत आहे आणि नवीन घरांच्या योजना लॉक डाऊनपूर्व काळाइतक्या वाढल्या असल्याचा दावा त्यांनी केला.
घर खरेदी करणाऱ्यामध्ये प्रथम घर खरेदी करणाऱ्याबरोबरच छोट्या घरातून मोठ्या घरात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांमध्ये घरांच्या किमतीमध्ये जे करेक्शन होणे अपेक्षित होते ते करेक्शन झाले आहे. त्याचबरोबर परिस्थितीजन्य कारणामुळे व्याजदर कमी आहेत. आता या पातळीवरून हे क्षेत्र आगामी काळामध्ये खात्रीने आगेकूच करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय उत्पन्नाशी घर तारण ठेवण्याचे प्रमाण भारतामध्ये केवळ 11 टक्के आहे.
इतर देशांमध्ये ते जास्त आहे. आगामी काळात ते वाढू शकेल. माहिती तंत्रज्ञान, ई -कॉमर्स, व्यावसायिक सेवा, वित्तीय सेवा या क्षेत्रातील तरुण कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे आणि हे कर्मचारी घर खरेदी करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे घरांची मागणी वाढत आहे. लक्झरी घरांच्या किमती अगोदरच 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. इतर क्षेत्रातील मात्र घरांच्या किमती आणखी वाढलेल्या नाहीत.
घर खरेदी करण्याची योग्य वेळ
पारेख यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षांमध्ये घर खरेदी करण्यासाठी सध्याची सर्वात योग्य वेळ आहे, असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटते. एक तर व्याजदर नीचांकी पातळीवर आहेत त्याचबरोबर विकसक घर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना बऱ्याच सवलती देत आहेत. या परिस्थितीचा ग्राहकांनी फायदा करून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.