वाघोली – मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी व ग्राहकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार लवकर सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी
सेल महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप थोरात यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी येत्या आठवड्यात आठवडी बाजार सुरु करणार असल्याचे ठोस आश्वासन पवार यांनी दिले असल्याचे थोरात यांनी सांगितले.
गेली दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाघोलीसह पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद आहेत. शेतकरी भाजीपाल्यासह अन्य माल बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. परंतु आठवडी बाजार बंद असल्याने व्यापारीवर्ग सुद्धा कमी प्रमाणात हजेरी लावतात.
माल खरेदी करण्यासाठी व्यापारी कमी येत असल्याने शेतकऱ्यांनी आणलेल्या माला पैकी केवळ सत्तर टक्केच मालाची व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जाते. उर्वरित ३० टक्के माल विकला न गेल्याने शेतकऱ्यांना मिळावे तसे दाम मिळत नसल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागते. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या ७० टक्के मालामध्ये सुद्धा काही माल खराब होतो.
त्यामुळे व्यापाऱ्यांना जादा दराने मालाची विक्री करावी लागते. त्यामुळे व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांसह ग्राहकांना सुद्धा याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आठवडे बाजार सुरु केल्यास शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी व्यापारी मोठ्याप्रमाणावर हजेरी लावणार आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल पूर्णपणे विकला जाईल आणि ग्राहकांना सुद्धा ताजा व स्वस्त दरात माल मिळू शकेल तसेच व्यापाऱ्यांचे सुद्धा नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांसह व्यापारी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन लवकरात लवकर आठवडी बाजार सुरु करावा अशी
मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील उपस्थित होते.
शेतकरी माल घेऊन येतात परंतु आठवडी बाजार बंद असल्याने बहुतांश व्यापारी माल खरेदीसाठी उदासीनता दाखवतात. जे व्यापारी माल खरेदीसाठी येतात ते शेतकऱ्यांचा साधारणत: ७० टक्केच माल खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा उर्वरित ३० टक्के माल खराब होतो. आठवडी बाजार सुरु झाल्यास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही.
– नवनाथ सातव (धान्य व्यापारी)
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे आठवडी बाजार सुरु करण्यासाठी मागणी केली आहे. येत्या आठवड्यात बाजार सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार सकारात्मक आहेत.
– (माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी जि.प. सदस्य रामभाऊ दाभाडे)