पुणे -राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील (आरटीओ) वाहनांचे कामकाज बंद आहे. त्यामुळे बऱ्याच वाहनचालकांचे काम थांबले आहे. राज्य सरकारने आरटीओमधील वाहनांसंदर्भातील कामे सुरू करावीत, अशी मागणी राज्य परिवहन आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
करोनामुळे वाहतूक व्यावसायिक आर्थिक व मानसिक तणावाखाली आहे. काहींनी जुन्या गाड्या विकल्या आहेत. तसेच, काही जण नवीन बीएस-सिक्स व्यावसायिक वाहने घेण्यासाठी विविध परवानगी प्रक्रियेची वाट पाहत आहेत.
मात्र, परिवहन कार्यालयातील वाहनावर घेतलेल्या कर्जाचा बोजा चढणे व उतरवणे, वाहन ट्रान्सफर, आरआरसी, परवाना नूतनीकरण, याबाबतचे कामकाज बंद असल्याने व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे या सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कॉंग्रेस नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाने केली आहे. सर्व आरटीओतील कामांची सुरुवात करण्याबाबत आदेश निघावेत, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली आहे.