नवी दिल्ली – श्रीलंकेला भारतातून तब्बल 92.1 दशलक्ष अंड्यांची आयात करायची आहे. श्रीलंकेतील अंड्यांच्या किंमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या चढ-उताराला नियंत्रित करण्यासाठी आणि श्रीलंकेतील ग्रहकांना स्वस्तात अंडी उपलब्ध करून द्यायची असल्याने श्रीलंकेला भारतातून अंड्यांची आयात करायची आहेत, असे श्रीलंकेच्या मंत्रिमंडळ सचिवांनी आज सांगितले.
सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. “द स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन’ने श्रीलंकेच्या बाजारातच अंड्यांच्या तुटवड्याबाबत आणि किंमतींच्या अनियमिततेबाबत चिंता व्यक्त केली असून भारताकडून अंड्यांची आयात करण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे, असे मंत्रिमंडळाचे प्रवक्ते आणि प्रसिद्धी माध्यम मंत्री बंडुला गुणवर्देना यांनी सांगितले.
परदेशी चलनाच्या तुटवड्यामुळे मार्च महिन्यापासून श्रीलंकेत पशुखाद्याचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी अंडी महाग झाली. त्यामुळे भारतातून अंडी आयात करण्याचा निर्णय घ्यावा लागला. मार्च महिन्यात श्रीलंकेला भारताकडून 20 लाख अंडी आयात करावी लागली होती.