पुणे – राजनांदगाव, छत्तीसगड येथे दोन टप्प्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय व्हिलचेअर बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संगांनी विजेतेपदाला गवसणी घातली. महिलांच्या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, केरळ आणि मणिपूर या सहा संघांनी भाग घेतला. ही स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळली गेली.
महाराष्ट्राच्या महिला संघाने त्यांचे पाचही सामने जिंकले आणि त्यानंतर कर्नाटकने केवळ महाराष्ट्राकडून पराभव स्वीकारला. अंतिम सामना महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात झाला. महाराष्ट्राने कर्नाटकचा २१-११ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. हे महाराष्ट्र महिलांचे सलग तिसरे राष्ट्रीय सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत कर्नाटकने प्रथमच रजतपदक जिंकले.
पुरुषांच्या स्पर्धेत महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर या अकरा संघांनी भाग घेतला. अकरा पुरुष संघांना तीन गटात विभागण्यात आले. प्रत्येक पूलमधील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा पंजाबशी तर कर्नाटकचा तामिळनाडूशी सामना झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकने अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीत महाराष्ट्र पुरुष संघाने कर्नाटकचा ४१ – ३२ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. सलग सात वेळा सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्र पुरुष संघांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी राजेशवर राव, सुशील कोठारी, सुनील गोलछा, कॅप्टन लुई जॉर्ज मेप्राथ, अब्राहम पौलोस, सुवर्णा लिमये, मेघना मुनोत, धनंजय शर्मा, सुश्री राधा राव, अमित कुमार आणि जयस्वाल यांनी मेहनत घेतली.