– प्रा. डॉ. सुभाष राठोड
मिसाईल मॅन अशी ओळख असलेले भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, दिवंगत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस 2015 पासून महाराष्ट्रात “वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांना भारतीय क्षेपणास्त्रांचे जनक म्हणून ओळखले जाते. ते आपल्या भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. त्यांच्या सन्मानार्थ 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणूनही साजरा केला जाईल असे संयुक्त राष्ट्रसंघाने 2010 मध्ये घोषित केले होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या डॉ. कलामांनी केवळ अभ्यास, अफाट वाचन, मेहनत, जिद्द आणि अपरिमित कष्ट यांच्या जोरावर आपल्या आयुष्यात प्रचंड मोठे यश संपादन केले. त्यांना शाळेतील मुले खूप आवडत असत. भारतातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये ते विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेत असत. मनमोकळा संवाद साधत, त्यांच्यात चैतन्य, प्रचंड आशावाद निर्माण करत असत. त्यांचा शेवटदेखील कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच झाला. देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते.
भारत नक्कीच महासत्ता बनेल हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून उदयास येणार आहे, भारताची खरी शक्ती ही देशातली युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी पटवून सांगितले होते. डॉ. ए. पी जे. अब्दुल कलाम यांचे लेखन अत्यंत स्फूर्तिदायी आहे. ते म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्राप्रमाणे असते. आजकालच्या रील्सच्या जमान्यात करमणुकीच्या साधनांचा अतिरेक वाढलेला आहे. आज शाळेत जाणारा विद्यार्थी असो वा महाविद्यालयात शिकणारे युवक असोत, स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टी. व्ही. यासारख्या आधुनिक साधनात आधुनिक पिढी गुरफटलेली दिसून येते.
त्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम वाचन कमी होण्यावर झालेला आहे. व्हॉटस्ऍप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाचा उपलब्धतेनंतर वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे अशी ओरड होताना दिसते, यात बऱ्याच अंशी तथ्यही आहे. वाचनाची पद्धत, माध्यम आणि जागा बदललेली दिसून येत आहे. पीडीएफच्या स्वरूपात वाचन संस्कृती बहरली पाहिजे. वाचकांची बदललेली अभिरुची ओळखून ऑडिओ बुक, किंडल बुक, ई बुक्स, इ लायब्ररी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. हल्लीचे तरुण मोबाइल, नेट सॅव्ही आहेत. त्यामुळे पुस्तकं मोबाइल-बुक, इ-बुक या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली तर त्याचा उपयोग होऊ शकेल व वाचनाची अभिरुची वृद्धिंगत होण्यास साहाय्यभूत ठरेल.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करणे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबवणे, प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी, एका विद्यार्थ्याला किंवा शाळेला वयानुरूप अशी पुस्तके भेट देणे, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून प्रत्येक शाळेत वाचू आनंदे या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्राचे आयोजन करणे, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानांचे आयोजन करणे, परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे,
पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या जीवनात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे, वाढदिवसाला पुस्तक भेट देणे, विद्यार्थ्यांचे गट करून विविध पुस्तकांवर चर्चा घडवून आणणे, शाळेच्या पुढाकाराने पुस्तक तुमच्या भेटीला, लोकसहभागातून वाचन कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करून शाळेत पुस्तक पेढी तयार करणे यासारखे नावीन्यपूर्ण विविध उपक्रम वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शाळा-महाविद्यालय स्तरावर आयोजित करणे अभिप्रेत आहे.
शाळा-महाविद्यालयात असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, फक्त शालेय पुस्तकी वाचन करण्यापेक्षा अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्यामध्ये जो अज्ञानरूपी अंधकार पसरलेला आहे, तो वाचन संस्कृती जोपासल्याने प्रकाशमान होण्याची शक्यता आहे. भाषा कौशल्ये सुधारणे, शब्दसंग्रह वाढवणे, आपले वाचन आणि लेखन कौशल्ये सुधारते, विद्यार्थ्यांना विचारप्रवण बनवणे, कल्पनाशक्ती वाढवणे हे वाचनप्रेरणा दिनाचे हेतू आहेत. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात. संवाद कौशल्य आणि स्मरणशक्ती, आकलनशक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. चांगला लेखक होण्यासाठी चांगला वाचक व्हायला हवे.
वाचन प्रेरणा दिनामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास नक्कीच मदत होणार आहे. शाळांमध्ये दर आठवड्यातील एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचनकट्टा तयार करणे, यांसारखे उपक्रम यानिमित्ताने हाती घेतले पाहिजेत. शाळांनी विद्यार्थ्यांना इनोव्हेटिव्ह (नावीन्यपूर्ण), प्रेरणादायी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयामध्ये वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी साहित्यिकांमार्फत मार्गदर्शन करण्यात यावे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने त्या दिवसातील एक तासग्रंथ वाचनासाठी देण्याचा प्रयत्न करावा. शासन परिपत्रकान्वये या दिनाच्या निमित्ताने करण्यात आले आहे.ज्ञानसमृद्ध व माहिती समृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, भाषा समृद्धी, साहित्य लेखन विकास इत्यादींसाठी वाचन संस्कृतीचा विकास करणे अत्यावश्यक आहे.
आपल्या कुटुंबात शिक्षणाची व श्रीमंतीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील जे भारताच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान होतात, भारताचा सर्वोच्च बहुमान पटकावतात ते डॉ. कलाम आपल्या सर्वांसाठी निश्चितच आदर्शवत व प्रेरणादायी आहेत. डॉ. कलाम यांनी आयुष्यभर ज्ञान संपादन करून त्यातूनच आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचला. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून निवडण्यात आला.