शशिदा इनामदार
जन्म प्रत्येक माणसाचा होतो, पण ज्यांच्या जन्माने इतरांच्या जन्माचे सोनं होतं, अशांचाच “जन्मोत्सव’ साजरा होतो. महात्मा गांधी अशाच विश्वमानवांपैकी एक! गांधीजींची सत्यनिष्ठा, देशभक्ती, अहिंसा, प्रेम आणि सेवावृत्तीचे आज त्यांच्या जयंती निमित्ताने स्मरण करूया.
“आधुनिक भारत’ या ग्रंथाचे लेखक आचार्य शं. द. जावडेकरांनी “सर्वश्रेष्ठ मानव’ म्हणून म. गांधींचा गौरव केला आहे. सत्य, अहिंसा, प्रेम, ब्रह्मचर्य या गुणांमुळे जगभरात गांधीजींना स्वीकारले आहे. आपण मात्र त्यांच्या मूळ उद्दिष्टांकडे पूर्णपणे दुर्लक्षच करीत आलो आहोत.
टॉलस्टॉय व रस्कीन यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला.
टॉलस्टॉय फार्म/फिनिक्स वसाहत स्थापन करून भारतीय प्राचीन गुरूकूल पद्धत त्यांनी द. आफ्रिकेत राबविली. बॅरिस्टर गांधींनी आपला विलायती पोशाख उतरवला. धोतर, पंचा स्वीकारला. बड्या पगाराची इंग्रजांची चाकरी नाकारून ते भारतीय स्वातंत्र्यलढाचे पाईक झाले. भारतभर हिंडून त्यांनी गोरगरीब जनतेच्या मानवी हक्कासाठी स्वतःला वाहून घेतले. भारताची सामाजिक, शैक्षणिक स्थिती सुधारली तरच राजकीय सुधारणा घडेल,
यासाठी स्वयंरोजगार, कुटिरोद्योगावर गांधीजींनी भर दिला. माझा हा “चरखा’च या देशाचा उद्धार करेल, असा संदेश जनतेला दिला. खादी, स्वदेशी वस्तूला प्राधान्य दिले. राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. आपापसातील द्वेष, मत्सर, चालीरिती, अंधश्रद्धेला फाटा द्यावा, देश स्वातंत्र्याचा विचार करावा, असे आवाहन करीत गांधीजींनी देशातील जनतेला एकत्र आणले. गांधीजींचे अहिंसात्मक युद्ध नवे होते. त्याला धर्म, नीतितत्त्वाचे अधिष्ठान होते. उपनिषदातील “आत्मबला’चा त्यास आधार होता. त्यामुळे ते “युगपुरुष’ ठरले.
अहमदाबाद जवळ एक “सत्याग्रहाश्रम’ स्थापन करून गांधीजींनी पतितपावन स्त्री-पुरुष वर्गापासून सर्व जाती, धर्म, पंथ, गोरगरीब, श्रीमंत, नाथ-अनाथ, वृद्ध, अपंग सर्वांसाठी खुला ठेवला. “मानवाची सेवा हीच ईश्वरसेवा’ मानून त्यांनी अनेकांचे अश्रू पुसले. अशा अनेक कथा वाचनात आल्या, त्यातील एक साधी, सरळ “सत्यकथा’ गांधीजींच्या निग्रहीपणाची, स्वच्छतेचा दाखला देते. त्यातील दोन प्रसंग…
होशियारी नावाची एक स्त्री आपल्या लहान गजराज नावाच्या मुलाबरोबर गांधीजींच्या आश्रमात आश्रयाला आली होती. ती दोघं तिथेच राहू लागली. ती दोघं गांधीजींच्या बरोबर फिरावयास जात असत. गांधीजींची प्रकृती बरीच क्षीण होत होती. उन्हाचा प्रचंड त्रास होत होता. छत्री घेण्यास ती आज विसरली. छत्री घेऊन येण्यास कोणास सांगावे, हा प्रश्न तिला पडला. वाटेत गांधीजी परिचयाच्या व्यक्तीशी बोलत आहेत, हे पाहून तिने छोट्या गजराजाला पाठवले.
त्याने छत्री आणली. ही गोष्ट गांधीजींच्या लक्षात येताच त्यांनी छत्रीचा स्वीकार केला नाही. उलट ते म्हणाले, गजराज तुझा मुलगा आहे तरी तो तुझा गुलाम नाही. तू त्याला पाठवून तुझी चूक लपविते आहेस. हे मला अजिबात आवडलेले नाही. याचा अर्थ आपले काम आपण दुसऱ्यांवर ढकलू नये, ही शिकवण या प्रसंगातून आपणास मिळते.
दुसऱ्या प्रसंगात, गजराज काही केल्या शाळेत जाईना. आईचं ऐकेना. हे पाहून गांधीजींनी त्याला मायेने जवळ घेऊन विचारले. तेव्हा तो म्हणाला, “घाणेरड्या कपड्यासह बसणाऱ्या मुलांत बसायला मला मुळीच आवडत नाही’. कदाचित तो खोटेही बोलत असावा. शाळेचा कंटाळा आला असावा, म्हणून ते गजराजबरोबर शाळेत दाखल झाले. तेथील शाळेचा परिसर, वर्गखोल्या, मुले सारेच अस्वच्छ. कोणाचेही त्याकडे लक्ष नाही. गजराजचे म्हणणे त्यांना पटले.
तरीही कुणावरही न रागावता शांतपणे म्हणाले, “ही शाळा तुमची आहे. कचरा, घाणीत एका जागी बसणाऱ्या गुरांचा गोठा आहे का? गुरे बिचारी मुकी असतात. दोरीने बांधलेली असतात. त्यांनाही स्वच्छता हवी असते. चांगले आरोग्य सर्वांनाच हवे ना? तुम्ही तर शहाणी मुले.
प्रत्येकाने आपली शाळा, आपल्या घरासारखीच स्वच्छ ठेवायला हवी आहे. विद्येच्या मंदिरात आपलं काम आपण स्वतःच करावयास हवं. आपले कपडे, शरीर, मन स्वच्छ ठेवा. हा स्वच्छतेचा पाठ गांधीजींनी दिला. अशा छोट्या छोट्या प्रसंगांतून गांधीजींचे विविध गुण आपल्यासमोर आले. लोकशिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिले हेही विसरता येणार नाही.