– हेमंत देसाई
बरोबर साडेचार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात कॉंग्रेसला सर्वाधिक म्हणजे 114 जागा मिळाल्या होत्या आणि एकूण 121 आमदारांच्या समर्थनाचे पत्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबाई पटेल यांच्याकडे सोपवले होते. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने तसेच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने कॉंग्रेसला समर्थन जाहीर केले होते. अपक्ष आमदारांचाही कॉंग्रेसला पाठिंबा मिळाला होता. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राजीनामा देत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी कॉंग्रेसतर्फे मुख्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे की कमलनाथ होणार, याची चर्चा सुरू झाली होती. प्रत्यक्षात तेव्हाचे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली आणि ज्योतिरादित्य यांना थोडे थांबायला सांगितले; परंतु त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज ते केंद्रात नागरी हवाई वाहतूकमंत्री म्हणून काम करत आहेत. उलट कमलनाथ यांचे सरकार भाजपने फोडाफोड करून पाडले आणि पुन्हा एकदा शिवराजसिंह मुख्यमंत्री बनले.
या वर्षअखेरीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, कॉंग्रेस पुन्हा एकदा सत्ता हासिल करण्याच्या मागे आहे. त्यादृष्टीने कमलनाथ यांनी तयारी सुरू केली आहे. आज कमलनाथ यांचे वय 77 असून, नऊ वेळा छिंदवाडा या मतदारसंघातून खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. कमलनाथ यांना “भाईजी’ असे म्हटले जाते आणि सत्तेत कोणीही असो, त्याची सूत्रे मात्र छिंदवाडा परिसरातून, म्हणजेच कमलनाथ यांच्या क्षेत्रातून हलतात, असे म्हटले जाते. कमलनाथ यांना पाच-सहा वर्षांपूर्वी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवून, पक्षाला जिंकवण्याची धुरा राहुल यांनी त्यांच्यावर सोपवली. त्यानुसार त्यांनी कॉंग्रेसला सत्तेत आणूनही दाखवले. कमलनाथ हे अत्यंत चाणाक्ष आणि व्यवस्थापन कुशल नेते असून, राजकीय सेटिंगमध्ये ते माहीर आहेत. त्यांच्या अनेक शाळा, महाविद्यालये आणि उद्योगधंदे आहेत.
कमलनाथ 1980 मध्ये प्रथम लोकसभेवर निवडून गेले. संजय गांधी यांचे ते डून स्कूलमधील शाळासोबती. “दि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी’ या व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी सरस राहिली आहे. 1991 साली ते केंद्रात प्रथमच वने व पर्यावरणमंत्री बनले. ग्रामीण विकास, वस्त्रोद्योग, व्यापार व उद्योग, रस्ते वाहतूक, नगरविकास, संसदीय कामकाज आदी अनेक खाती त्यांनी सांभाळली आहेत. 2012 मध्ये मनमोहन सिंग सरकार असताना थेट परदेशी गुंतवणूकविषयक चर्चेत कमलनाथ यांनी आपल्या युक्तिवादाची चमक दाखवली होती. नियोजन आयोगावरही सदस्य या नात्याने कमलनाथ यांनी काम पाहिले आहे. केवळ मंत्रिमंडळातीलच नव्हे, तर कॉंग्रेसमध्येही सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, या पदासाठी कमलनाथ यांचे नावही चर्चेत होते. नेहरू-गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून त्यांना ओळखले जाते.
आता गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत ज्या ज्या ठिकाणी कॉंग्रेसचा पराभव झाला, त्या त्या मतदारसंघाचा दौरा कमलनाथ करत आहेत. पक्षांतर्गत मतभेद मिटवणे आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे ही दोन्ही कामे ते या वयातही जिद्दीने करत आहेत. सात महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत राज्यात प्रस्थापित सरकारविरुद्ध वातावरण आहे, असा कॉंग्रेसचा अंदाज आहे. मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात कॉंग्रेसला विजय मिळाल्यास, लोकसभा निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होईल.नुकतेच छिंदवाडा या आपल्या मतदारसंघात एका कार्यक्रमात कमलनाथ यांनी कॉंग्रेस सत्तेवर आल्यास “नारी सन्मान योजना’ राबवली जाईल, अशी घोषणा केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक गोरगरीब घरास सवलतीत घरगुती गॅस सिलिंडर दिला जाईल. तसेच स्त्रियांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसाह्य दिले जाणार आहे. शिवराजसिंह सरकार दरमहा महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करणारी “लाडली बहेन योजना’ राबवत आहे.
आपली योजना त्यापेक्षा अधिक चांगली असेल, असा कमलनाथ यांचा दावा आहे. 27 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, 100 युनिटपर्यंत केवळ शंभर रुपयात वीज, जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि “राम वन गमनपथा’साठी वीस कोटी रुपयांची गुंतवणूक करणे अशी अभिवचने कमलनाथ यांनी दिली आहेत. वनवासात असताना भगवान राम मध्य प्रदेशात ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला होते, त्या त्या ठिकाणच्या क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. मध्य प्रदेशमधील आगामी निवडणूक भाजप धर्मवादी विषयांवर नेईल, याची खात्री असल्यामुळेच कॉंग्रेसने या युक्त्या वापरण्याचे ठरवलेले दिसते. परंतु मोदी कोणतीही निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर नेऊन प्रतिपक्षावर मात करतात हे लक्षात घेऊन, स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगानेच निवडणूक लढवायची आणि तसाच प्रचार करायचा, ही रणनीती कमलनाथ यांनी आखली आहे. गेल्यावेळी कमलनाथ यांचे सरकार “ऑपरेशन लोटस’ राबवून भाजपने पाडले होते. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 20 आमदार कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेले. यावेळीही जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येईल, तसतसा फोडाफोडीला ऊत येईल.
पण कमलनाथ हे अत्यंत अनुभवी आणि चलाख नेते असल्यामुळे, ते भाजपाच्या प्रत्येक चालीस चोख प्रत्युत्तर देतील, अशी अपेक्षा आहे. कमलनाथ हे प्रत्येक मतदारसंघाचा पाहणीच्या आधारे अभ्यास करतात. स्थानिक नेत्यांशी बोलतात आणि नंतर त्या त्या ठिकाणचे व्यवस्थापन करतात, अशी माहिती कॉंग्रेस प्रवक्ते पियूष बघेल यांनी दिली आहे. इंदूरमध्ये अलीकडेच एका आदिवासी युवकाचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. त्याविरुद्ध कॉंग्रेस आमदारांनी मार्च महिन्यात विधानसभेत हंगामा केला. मोरेना येथे काही दिवसांपूर्वीच सहा जणांना ठार मारण्यात आले. हे प्रश्नही कमलनाथ यांनी प्रचारयात्रेत उचलले आहेत. मध्य प्रदेशमधील पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार झाला. तसेच राज्यातील नऊ नर्सिंग कॉलेज बोगस असल्याचे उघड झाले आहे. तसेच करम धरण प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
आपले सरकार कार्यक्षम व प्रामाणिक असल्याचा शिवराजसिंह यांचा दावा आहे. तो कसा फोल आहे ते दाखवण्याचा कमलनाथ यांचा प्रयत्न सुरू आहे. तर कमलनाथ मुख्यमंत्री असताना, त्यांनी जाहीर केलेल्या योजना कागदावरच राहिल्या, असा भाजपचा आरोप आहे. कमलनाथ हे आपल्या कारकिर्दीत दिल्लीतच कार्यरत होते. त्यांचा राज्याशी काहीही संबंध नाही, अशी टीका भाजपतर्फे केली जात आहे. एकूण, मध्य प्रदेशमधील राजकारणात निवडणुकीपूर्वीच रंगत निर्माण झाली आहे.