– माधव विद्वांस
भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार, विक्रम साराभाई यांचा आज 30 डिसेंबर रोजी स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा…
विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांचे वडील अंबालाल साराभाई उद्योगपती होते. त्यांच्या घरी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू आदी लोकांचे जाणे-येणे असायचे. त्यांना 8 मुले होती. त्यांच्या पत्नी सरलाबाई यांनी मुलांसाठी घरातच माँटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईंचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्यांचे 12वी पर्यंतचे शिक्षण झाल्यावर साराभाई यांचे पुढील शिक्षण अहमदाबाद येथील गुजरात कॉलेजमध्ये झाले.
त्यानंतर वर्ष 1937 मधे पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले. तेथे सेंट जॉन्स कॉलेजातून 1939 मध्ये रसायनशास्त्र व भौतिकी या विषयांतील ट्रायपास परीक्षा उत्तीर्ण झाले, तसेच त्यांनी बीए व एमए या पदव्या संपादन केल्या.
दुसरे महायुद्घ सुरू झाल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी बंगलोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विककिरणांसंबंधी संशोधन केले. दरम्यान साराभाई यांचा विवाह सप्टेंबर 1942 मध्ये विख्यात नर्तिका मृणालिनी यांच्याशी झाला. या दांपत्याला कार्तिकेय व मल्लिका ही मुले झाली. यांपैकी मल्लिका या प्रसिद्घ नर्तिका आहेत. दुसरे महायुद्घ संपल्यानंतर 1945 मध्ये ते केंब्रिज येथील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत दाखल झाले. तेथे त्यांनी उच्च-ऊर्जावान प्रकाशकणाचे (फोटॉनचे) शोषण झाल्याने युरेनियम (238) या समस्थानिकाच्या (तोच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराच्या)झालेल्या विघटनाविषयी संशोधन केले.त्यांनी ‘कॉस्मिक रे इन्व्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्यूड्स’ हा प्रबंध लिहिला व त्याबद्दल त्यांना 1947 मध्ये डॉक्टरेट पदवी मिळाली.
भारतात परतल्यावर विक्रम साराभाई यांनी भौतिक प्रयोगशाळा उभारण्याचे ठरविले. त्यासाठी मित्रांकडून आणि साराभाई कुटुंबाच्या व्यवस्थापनामधील विश्वस्त निधीमधून त्यांनी निधी उभारला. त्यांतून त्यांच्या आई-वडिलांनी स्थापन केलेल्या अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या एम. जी. सायन्स इन्स्टिट्यूटमधील काही खोल्यांमध्ये त्यांनी भौतिकीची प्रयोगशाळा उभारली. अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना अशा प्रकारे 11 नोव्हेंबर 1947 रोजी झाली. तेथेच त्यांनी भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी बहुतेक संशोधन येथेच केले.
तसेच वैश्विक किरण विज्ञान, अवकाश विज्ञान, अतिउच्च वातावरण विज्ञान, आयनांबर विज्ञान, सैद्घांतिक अणुकेंद्रीय भौतिकी व आयनद्रायू भौतिकी या विषयांच्या संशोधनाचा तेथे पाया घातला. तसेच त्यांनी ‘अहमदाबाद टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन’ या संस्थेची स्थापना करून भारतातील कापड उद्योगातील संशोधनाचा पाया घातला.त्यांच्या प्रयत्नातून वैश्विक किरणांच्या प्रमाणेच सौर भौतिकी व आंतरग्रहीय भौतिकी या विषयांचे अभ्यासासाठी भारतात बंगलोर, पुणे, काश्मीर, हिमालय इत्यादी अनेक ठिकाणी निरीक्षण केंद्रे उभारली गेली.
सर होमी भाभा यांच्या सक्रिय पाठिंब्याने विक्रम साराभाईंनी देशातील पहिले रॉकेट लाँचिंग सेंटर अरबी समुद्रकिनार्यावरील थुंबा या ठिकाणी वर्ष 1963 मधे उभारले. हे ठिकाण विषुववृत्ताच्या बरेच जवळ आहे. तेथून 21 नोव्हेंबर 1963 रोजी सोडियम बाष्प पेलोड तंत्र वापरून भारताचे पहिले रॉकेट यशस्वी रीतीने अवकाशात पाठविले. वर्ष 1965 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने आंतरराष्ट्रीय अवकाश सुविधा म्हणून या केंद्राला मान्यता दिली.वर्ष 1967 मध्ये त्यांनी अहमदाबाद येथे एक्स्परिमेंटल सॅटेलाइट कम्युनिकेशन अर्थ स्टेशन हे केंद्र उभारले.
सर्वसामान्य जनतेला विज्ञानाचे व्यावहारिक उपयोग समजायला हवेत, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. त्यांनी प्रगत तंत्रविद्येत क्षमता मिळविण्याचा ध्यास घेतला होता. तसेच तंत्रविद्येच्या मदतीने त्यांना देशापुढील प्रश्न सोडवावयाचे होते. त्यातूनच त्यांना देशातील वास्तव साधनसंपत्तीचे तांत्रिक व आर्थिक मूल्यमापन करायचे होते. अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्घ झालेले आहेत.
त्यांच्या मृत्यूनंतर भारताच्या राष्ट्रपतींनी ‘विक्रम अर्थ स्टेशन’ असे नामकरण केले. होमी भाभा यांच्या निधनानंतर विक्रम साराभाई भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव झाले (कार्यकाल 1966-71). तसेच त्यांची आंतरराष्ट्रीय पग्वॉश कंटिन्युइंग कमिटी, इंडियन पग्वॉश कमिटी, संयुक्त राष्ट्र भारतीय सल्लागार समिती आणि आंतरराष्ट्रीय सौरविज्ञान मंडळ यांचे सदस्य म्हणून निवड झाली होती.
साराभाई यांना त्यांच्या वैज्ञानिक अभ्यास व संशोधनामुळे अनेक मानसन्मान मिळाले. त्यामधे शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक (1963), भारत सरकारचा पद्मभूषण हा किताब (1966) आणि पद्मविभूषण (1972 मरणोत्तर) यांचा समावेश आहे. इंटर नॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन या संस्थेने चंद्राच्या 21ओ अक्षांश व 24.7ओ रेखावृत्त येथील ‘बेसेल-ए’ या विवरास साराभाई हे नाव दिले आहे. त्यांच्या जन्मदिनी त्यांचा ब्राँझचा पुतळा इस्रोच्या बंगलोरमधील अंतरिक्षभवन या मुख्यालयात 2004 मध्ये बसविण्यात आला. साराभाई यांचे त्यांच्या कर्मभूमीतच 30 डिसेंबर 1971 रोजी तिरुअनंतपूरम् येथे निधन झाले.