सत्यजित दुर्वेकर
भारतीय खाद्यसंस्कृतीत गव्हापेक्षा तांदळाला अधिक महत्त्व दिले गेले आहे. भोजनाव्यतिरिक्त देवपूजेतसुद्धा अक्षता म्हणून तांदळाचाच वापर केला जातो. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या संस्कारांमध्ये गव्हाला कुठेच स्थान दिलेले पाहायला मिळत नाही. लहान बाळाला खीर करून देण्यासाठी तांदळाचाच वापर केला जातो आणि माणसाच्या अंतिम संस्कारामध्येही पिंडदानासाठी तांदळाचाच वापर केला जातो.
गव्हाच्या आट्यामुळे खरोखर पोट सुटते का? प्रश्न ऐकून धक्का बसेल; पण ही गोष्ट खरी आहे. भारतातील स्वयंपाकघरांमध्ये गव्हाची घुसखोरी झाल्यापासून मधुमेहाच्या तक्रारीही वाढल्या आहेत. गव्हाचा आटा खाणाऱ्यांचे पोट मोठे होते. मोठे पोट असलेल्यांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. ही गोष्ट ऐकताना थोडी विचित्र वाटत असली तरी ती गांभीर्याने सांगितली गेली आहे. लोकांना मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी अमेरिकेतील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विलियम डेविस यांनी असा इशाराही दिला आहे की, आजारांपासून दूर राहायचे असेल तर गव्हाचा आटा खाणे सोडून द्या.
अमेरिकेत मोठ्या संख्येने मधुमेहाला बळी पडत असलेल्या लोकांना गव्हापासून दूर ठेवण्यासाठी डॉ. डेविस यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. त्याचे नाव “व्हीट बेली’ असे ठेवण्यात आले असून, त्याचा मराठी अर्थ “गव्हाचे पोट’ असा होतो. 2011 मध्ये लिहिण्यात आलेले हे पुस्तक अमेरिकेत चर्चेचा विषय ठरले आणि तेव्हापासूनच आहारातून गहू वजा करण्याची मोहीम मोठ्या जोमाने चालविली जात आहे. या मोहिमेला यशही आले आहे, कारण मधुमेहासारख्या धोकादायक आजारापासून लोकांना दूर राहायचे आहे.
या पार्श्वभूमीवर “गव्हाचे पोट’ या पुस्तकात डॉ. डेविस यांनी काय म्हटले आहे, हे काळजीपूर्वक पाहायला हवे. डॉ. डेविस यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेली एक गोष्ट भुवया उंचावयाला लावणारी आहे. ते म्हणतात की, स्थूलता, मधुमेह आणि हृदयविकारांपासून दूर राहायचे असेल तर पूर्वीच्या भारतीयांप्रमाणे खाण्यापिण्याच्या सवयी लावून घ्या. ज्वारी, बाजरी, मका, जवस, हरभरा, वरी, नाचणी, भगर आदी अन्नघटकांचा वापर पूर्वी भारतात केला जात होता.
डॉ. डेविस यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय खाद्यसंस्कृतीत गव्हापेक्षा तांदळाला अधिक महत्त्व दिले गेले आहे. भोजनाव्यतिरिक्त देवपूजेतसुद्धा अक्षता म्हणून तांदळाचाच वापर केला जातो. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या संस्कारांमध्ये गव्हाला कुठेच स्थान दिलेले पाहायला मिळत नाही. लहान बाळाला खीर करून देण्यासाठी तांदळाचाच वापर केला जातो आणि माणसाच्या अंतिम संस्कारांमध्येही पिंडदानासाठी तांदळाचाच वापर केला जातो.
पाश्चात्य फॅशनप्रमाणेच पारंपरिक भारतीय भोजनात गव्हाने कुठून शिरकाव केला हे समजण्यास मार्ग नाही. 1980 च्या दशकात गव्हाची पोळी घराघरात तयार केली जाऊ लागली आणि तेव्हापासूनच लोकांना स्थूलतेसह हृदयविकार आणि मधुमेहाचा त्रास सुरू झाला. जेवढ्या वेगाने गव्हाचा वापर वाढत गेला, त्याच्या दुपटीने आजारांचे प्रमाण वाढत गेले. परंपरागत भारतीय भोजनात ज्वारी, बाजरी, मका यांची भाकरी सर्वांत महत्त्वाची मानली जात होती. या भाकरी घरोघरी बनविल्या जात असत. मका आणि ज्वारीची भाकरी विशेषतः सर्वत्र खाल्ली जात होती. थंडीच्या दिवसांत बाजरीची भाकरी मोठ्या आवडीने खाल्ली जात असे.
भाकरीवर भरपूर तूप किंवा लोणी लावले जात असे. गव्हाच्या बरोबर हरभरा किंवा मका एकत्रित करून तो आटा वापरला जात असे. गव्हाच्या आट्याची रोटी क्वचितप्रसंगी पाहुणे आल्यावर केली जात असे. त्यावरही तुपाची धार असे. पुरी बनविण्यासाठी गव्हाच्या आट्याचा वापर केला जात असे. ज्वारीसारखी अन्नधान्येच भारतीय आहारात प्रामुख्याने समाविष्ट होती. त्यामुळे आजच्यासारखे त्या काळी लोकांना आजार जडत नसत.
गहू हे मूलतः भारतातील पीकच नव्हे. हे मध्य आशिया आणि अमेरिकेतील पीक मानले जाते. आक्रमकांनीच गहू भारतात आणला. गव्हाची रोटी किंवा चपाती लवकर तयार होते म्हणून तो भारतात लोकप्रिय झाला. परंतु जेवढी सहजपणे ती तयार होते, तितकी सहजपणे ती पचत मात्र नाही. गव्हाची रोटी रोज खाल्ल्यामुळे लोकांचे पोट सुटत जाते. याच कारणामुळे भारतीयांचे सरासरी वजन वाढत चालले आहे. पोट बाहेर येत चालले आहे.
हृदयरोग आणि मधुमेहासारखे आजार यामुळेच लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रस्त करू लागले आहेत. अमेरिकेतील डॉ. डेविस यांनी “गव्हाचे पोट’ पुस्तक लिहून गव्हाच्या बाबतीत लोकांना इशारा दिला आहे. भारतात उत्पादित होणारी ज्वारी-बाजरीसारखी धान्ये आपल्या शरीराला पोषक घटक देतात. हे घटक आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात. त्यामुळे अशा धान्यांचा समावेश आपण आपल्या भोजनात जास्तीत जास्त करणे हीच काळाची गरज आहे.