वाठार स्टेशन – पतसंस्था चळवळीमध्ये महाराष्ट्रात अडचणीचा काळ असतानाही छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन करून संमिश्र व्यवसायात गतवर्षीपेक्षा 135 कोटी 86 लाखांची वाढ केली आहे. ही एक हजार कोटींचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पार करणारी राज्यातील ग्रामीण भागातील एकमेव पतसंस्था आहे. संस्थेस पाच कोटी पाच लाख रुपये इतका ढोबळ नफा झाला असून त्यातून तरतुदी वजा जाता निव्वळ नफा तीन कोटी तीन लाख रुपये इतका झाला आहे.त्यातून सभासदांना सहा टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले.
पिंपोडे बुद्रूक (ता.कोरेगाव) येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पिंपोडे येथील छत्रपती संभाजी महाराज सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ.सोपानराव चव्हाण होते. मागील सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करण्यात आले. अहवाल वाचन करताना संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सभासदांनी हात उंचावून सर्व ठरावांना मंजुरी दिली. व्यासपिठावर संचालक मंडळ उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या ठेवीमध्ये गतवर्षीपेक्षा 68 कोटी 10 लाखांनी वाढ झाली आहे. गेल्या 35 वर्षातील हा उच्चांक असून 31 मार्चअखेर संस्थेकडे 570 कोटी 49 लाख रुपयांच्या ठेवी आहेत तर येणे कर्ज 424 कोटी 29 लाख 91 हजार रुपये इतके आहे. एकूण कर्जाच्या 30 ते 35 टक्के सुरक्षित सोनेतारण कर्ज आणि भागभांडवल, गुंतवणूक, खेळते भांडवल, स्वनिधी या सर्वच बाबतीत लक्षणीय वाढ झाली असल्याचे लेंभे यांनी सांगितले.
चेअरमन डॉ.सोपानराव चव्हाण म्हणाले, एक हजार कोटींचा संमिश्र व्यवसाय केल्याने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे. सर्वांच्या सहकार्याने हे काम होऊ शकले. फक्त ठेवी गोळा करणे व कर्जवाटप करणे एवढेच न करता संस्थेचे सामाजिक कार्यही सुरू असते.
संचालक सुरेशराव साळुंखे म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम संस्थेने केले आहे. ही चळवळ अधिक गतिमान कशी होईल, वाडी- वस्तीवरील नागरिकांच्या हाताला काम मिळावे यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. सभासदांनी सर्व ठरावांना एकमताने मंजुरी दिल्याबद्दल आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. व्हाईस चेअरमन श्रीकांत शेटे, संचालक अशोकराव लेंभे, सत्यवान मतकर, कल्याण पाचांगणे यांची भाषणे झाली. पाच आदर्श ग्राहकांचा सत्कार करण्यात आला. अनुराधा आतकरी यांना कर्जदार, सभासद व स्वसुरक्षा विम्याचा दोन लाख 25 हजारचा धनादेश प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले. कार्यकारी संचालक भावेश ढमाळ यांनी आभार मानले.