मुंबई – कॉंग्रेसने सावरकरांवर टीका केली त्यावेळी उद्धव ठाकरे हे शांत का बसले असा प्रश्न काल भाजपने उपस्थित केला होता. त्याचा समाचार घेताना शिवसेनेने आज म्हटले आहे की भाजपला सावरकरांचे इतके प्रेम आहे तर अजून सावरकरांना भारतरत्न पुरस्कार का मिळाला नाही.
आज येथे पत्रकारांशी बोलताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले कीे, सावरकर हे महान हिंदुत्व नेतृत्व आहे. त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवले गेले पाहिजे ही शिवसेनेची मागणी आहे. राऊत म्हणाले की, सावरकरांवरील टीकेच्या संबंधात शिवसेना कधीही गप्प बसलेली नाही आणि यापुढेही गप्प बसणार नाही.
सावरकर हे हिंदुत्व आणि शिवसेनेसाठी नेहमीच आदर्श राहिले आहेत. पण या विषयावरून जे आज आमच्यावर अंगुलीनिर्देश करीत आहेत ते सावरकरांना भारतरत्न पुरस्कार कधी देणार हा आजचा मुख्य प्रश्न आहे असेही राऊत यांनी नमूद केले.