मुंबई : शिवसेना वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठले आहे. त्यामुळे सरकार कोसळतं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. आता यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे.
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीकडून सुरुवातीपासून मौन बाळगण्यात आलं होतं. मात्र आता शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यापूर्वी देखील अशाप्रकारची बंडाळी झाली होती. बंडाळीची ही घटना तिसऱ्यांदा घडते आहे. याआधी दोन्ही वेळा ते अपयशी ठरले. त्यामुळे मागील अडीच वर्षापासून सरकार नीट चाललं असल्याचं पवारांनी म्हटलं.
मुख्यमंत्रीपदावर पवारांचं भाष्य
शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते ज्यांना मुख्यमंत्री करतील तो आम्हाला मान्य असले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चांगलं काम करत आहे. आता विधानपरिषदेला क्रॉस वोटिंग झालं. ते नेहमीच होतं. परंतु, सरकारला कुठलाही धोक नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.