विजय लाड, कोयनानगर –
शंभूराज शिवाजीराव देसाई हे नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे उठून दिसणारे नाव. पाटण तालुक्यात लोकप्रियतेच्या वाटेवर आपल्या विधायक कामाने व दूरदृष्टीने स्वार झालेले लोकनायक म्हणून शंभूराज देसाई यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या 30 पेक्षा अधिक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात आहेत. आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा चालवणारे शंभूराज देसाई हे अनेक महत्त्वाची पदं भूषवत आहेत. नव्वदच्या दशकामध्ये राजकरणात प्रवेश केलेल्या व सध्याच्या शिंदे सेनेच्या मंत्रिमंडळात पॉवरफुल मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंभूराज देसाई यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द व प्रवास अतिशय कष्टपद असून त्यांचे नेतृत्व सर्वस्पर्शी आहे. त्यांनी आपले जीवन समाजासाठी त्यागले असून त्या संघर्ष नायकाची प्रेरणादायी राजकीय गाथा…
आज महाराष्ट्रात मराठी टी.व्ही. चॅनलमध्ये एक राजकीय चेहरा सतत दिसत असतो. सरकारची अभ्यासपूर्ण बाजू मांडताना ना. शंभूराज देसाई टी.व्ही. चॅनलवर दिसतात. मध्यंतरी तत्कालीन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी टी.व्ही. चॅनेलवर सारखे दिसायची मक्तेदारी शंभूराज देसाई यांनी घेतली आहे का? असा सवाल केला होता. असे हे हजरजबाबी व्यक्तिमत्त्व सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खूप चर्चेत असले, तरी महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढा संघर्ष शंभूराज देसाई यांनी केला आहे. तेवढा कदाचितच दुसऱ्या कोणी केला असेल. म्हणून संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे ‘शंभूराज’ म्हणावे लागते. मुख्यमंत्र्यांच्या ‘ठाणे’ जिल्हाचे पालकमंत्री पद भूषवणे हेच देसाई यांचे आज राज्याच्या राजकारणात कर्तृत्व दर्शवते. आज शंभूराज देसाई यांच्या जन्मदिनी पाटण तालुक्यातील युवकांसह जनतेसाठी, तसेच महाराष्ट्रात ज्यांच्या नशिबी राजकीय संघर्ष येत आहे, त्यांच्यासाठी शंभूराज देसाई यांची गरूडभरारी प्रेरणादायी ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोजकीचं घराणे टिकून आहेत. यापैकी पाटणचे देसाई घराणे एक आहे. सध्या देसाई घराण्याची तिसरी पिढी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून आज राज्याच्या सक्रिय राजकारणात आहे. महाराष्ट्रात अनेक घराण्यांना जेवढा राजकीय संघर्ष करावा लागला नसेल, दुर्दैवाने तेवढा राजकीय संघर्ष देसाई घराण्याच्या नशिबी आला. महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप पाडलेले हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच राजकारणी आहेत. त्यातही ‘लोकनेते’ ही पदवी मोजक्याच नेत्यांना मिळाली. त्यापैकी एक ‘लोकनेते बाळासाहेब देसाई’ राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान असलेले, तसेच अनेक मंत्रीपदे सक्षमपणे हाताळलेले लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ओळख संपूर्ण राज्यात त्यांच्या कर्तुत्वाने आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांची महाराष्ट्रासाठी स्मरणीय कामगिरी म्हणजे ई.बी.सी. शैक्षणिक सवलत होय. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाच्या निर्मितीत बांधकाम मंत्री असताना आर्थिक, प्रशासकीय, मनुष्यबळची रसद पुरवण्यात लोकनेत्यांचा मोठा हातभार आहे.’ भूकंपामध्ये पाटण तालुक्यातील उध्वस्त झालेले शेवटचे घर पूर्ण केल्याशिवाय तालुका सोडला नाही,’ असे ठामपणे सांगणाऱ्या लोकनेते साहेबांनी लोकांना पुन्हा उभी करून दिलेल्या घरातील भिंतीवर फोटोचा मान आजही त्यांना आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई-कुलाबा “गेट वे ऑफ इंडिया” येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सध्या परदेशी पर्यटक व भारतीयांचा सेल्फी पॉइंट बनला आहे. तो लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी उभारला आहे. त्यांची राजकीय कारकीर्द पाहता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे भक्कम दावेदार मानले जात होते. परंतु, कर्तुत्व वाढले की शत्रुत्व आंदण मिळते.
पाटण मतदारसंघात निर्विवादपणे एकहाती अंमल असणाऱ्या लोकनेते यांना सुप्त विरोध होत होता. मात्र, जनतेमध्ये त्यांना मोठा आदर असल्याने विरोधकांची डाळ शिजत नव्हती. लोकनेते साहेबांचे 24 एप्रिल 1983 साली निधन झाले आणि भूकंप उराशी घेवून झोपणाऱ्या पाटणच्या जनतेचा आधार गेला. त्यांनतर देसाई गटाची जबाबदारी मुंबईमध्ये आपला व्यावसायिक जम बसवलेल्या लोकनेत्यांचे पुत्र व ना. शंभूराज देसाई यांचे वडील शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्यावर आली. आज जर लोकनेत्यांचा वारसा आबासाहेबांनी जपला नसता, तर हे घराणे पैशात लोळले असते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर येथील मोक्याच्या प्रभादेवीचा पेट्रोल पंप विकून आबासाहेब तालुक्यात परतले. 1984 ची पोटनिवडणूक विरोधकांनी गनिमी काव्याने मोठया विद्रोही वातावरण निर्मितीत जिंकली. 1985 साली देखील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देसाई गटाला पराभव पत्करावा लागला. 1986 शिवाजीराव देसाई यांचे निधन झाले व दुसरा मोठा झटका देसाई गटाला बसला. इकडे विरोधक सत्तेच्या माध्यमातून मजबूत बनत चालले होते.
आता देसाई गटाची जबाबदारी आली ती लोकनेते यांच्या सूनबाई व शंभूराज देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांच्यावर. हा काळ खरा कसोटीचा होता. मैत्रीपूर्ण लढती आता कट्टर व पारंपरिक झाल्या होत्या. सत्ताधारी विरोधकांनी भलताच आक्रमक पवित्रा घेतला होता. शहर व डोंगरी गावांत प्रचारा दरम्यान चकमकी घडत होत्या. तालुक्यात दशहतीचे राजकारण सुरू झाले होते. विरोधक सत्तेत होते. महाराष्ट्रातील एक मोठी राजकीय ताकद पाठीशी असल्याने विरोधकांचे अनेक डावपेच खरे ठरत होते. इकडे मात्र देसाई गट पुरता हतबल झाला होता. अनेक वर्ष सत्तेपासून दूर राहिल्याने या गटाला मरगळ आली होती. 1990 च्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीमती विजयादेवी देसाई यांचा 22 हजार मतांनी पराभव झाला आणि देसाई गटाला विजय अशक्य वाटू लागला. मात्र याच दरम्यान 1992 मध्ये शंभूराज देसाई यांनी तालुक्याच्या राजकीय आखाड्यात जिल्हा परिषद सदस्य होऊन प्रवेश केला.
1990- 1996 दरम्यान देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कडक स्वभावाच्या टी. एन. शेषन यांची नियुक्ती झाली. त्यांचा धसका अनेकांनी घेतला. निवडणूक आचारसंहिता भंग अथवा गैरवर्तन असेल, तर कारवाई ठरलेली होती. टी. एन. शेषन यांचा सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे त्यांनी बोगस मतदान रोखण्यासाठी पात्र मतदारयादी सुलभ करत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणली. 1995 च्या पंचवार्षिक निवडणुकीत देशभरात अनेक उमेदवारांचे नशीब फळाला आले. मात्र, नवख्या शंभूराज देसाई यांचा अवघ्या 736 मतांनी पराभव झाला. मताधिक्य कमी झाल्याने देसाई गट पुढील पंचवार्षिक निवडणुकीसाठी पूर्ण चार्ज झाला. देसाई गटाला खरी ऊर्जा 1997 साली मिळाली. एरव्ही निवडणूक प्रचाराशिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सहसा दौरे, प्रवास टाळत होते. परंतु, लोकनेते बाळासाहेब देसाई व शिवसेना प्रमुखांच्या स्नेहसंबंधांमुळे त्यांनी पाटण सारख्या ग्रामीण ठिकाणच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्विकारले. शंभूराज देसाई यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला.
याच कार्यक्रमात शंभूराज देसाई यांना महाराष्ट्र राज्य सहकार परिषदचे अध्यक्ष पद बहाल केले आणि देसाई गटाचा लालदिवा पुन्हा पाटण तालुक्यात फिरू लागला. 1999 सालच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विजयाची पूर्ण खात्री असताना शिवसेना पक्षाची ताकद व राज्यमंत्रीपद दर्जा मिळालेल्या शंभूराज देसाई यांच्या पराभवाची रणनीती राज्यपातळीवर आखली गेली आणि पुन्हा एकदा देसाई गटाच्या पदरी निराशा पडली. शंभूराज देसाई यांनी दिलेली झुंज पाहून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात देसाईंचे विरोधक असलेल्या विक्रमसिंह पाटणकर यांना मंत्रीपद देत सार्वजनिक बांधकाम खाते व पर्यटन खात्याचा अतिरिक्त भार देउन राष्ट्रवादी पक्षाने मोठी ताकद दिली. आता काही खरे न्हवते. विकास सेवा सोसायटी, बाजार समिती, पंचायत समिती, ग्रामपंचायती, पतसंस्था, विरोधकांच्या ताब्यात जात होत्या. विरोधक सत्तेतून बलवान होत गेले. कारखान्याची सत्ता सोडली, तर देसाई गटाला सावरण्यासाठी गरज होती ती फक्त एका विधानसभा विजयाची…
तब्बल 20 वर्ष सत्तेपासून दूर राहिलेला देसाई गट विखुरला जात होता. अडल्या –नडल्या कामांसाठी लोक विरोधकांकडे जात होती. देसाई गटात नैराश्य आले होते. 2004 ची पंचवार्षिक निवडणूक मोठ रंगतदार झाली. यांनी निवडणुकीत शंभूराज देसाई पहिल्यांदा आमदार झाले. बलाढ्य विरोधक कॅबिनेट मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा सहा हजार मतांनी पराभव करत दोन दशकानंतर देसाई गटाने आमदारकी खेचून आणली. शिवसेनेस देखील साताऱ्यात प्रतिनिधित्व मिळाले. देसाई गटात नवचैतन्य निर्माण झाले. बलाढ्य मंत्री महोदय यांचा पराभव केलेल्या नवख्या झुंजार शंभूराज देसाई यांच्याकडे महाराष्ट्रातील आमदार कुतूहलाने पाहू लागले. लोकनेत्यांच्या नातवाचे पाहिले पाऊल विधानसभेत पडले. आपल्या पहिल्याच आमदारकीत शंभूराज देसाई यांनी लोकनेत्यांच्या नावास केलेले साजेसे कार्य महाराष्ट्राने पाहिले. विरोधी बाकावर असताना सरकारला अभ्यासपूर्ण प्रश्नांचा भडीमार, संसदीय कार्यपद्धतीत उत्तम वर्तवणूकीसाठी महामाहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार शंभूराज देसाई यांना मिळवला.
पाच वर्षांच्या मतदारसंघातील कार्याचा अहवाल देखील राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रकाशित करत शंभूराज देसाई यांनी आपल्या विकासकामांची चुणूक संपूर्ण महाराष्ट्रास दाखवून दिली. सातारा जिल्हा बालेकिल्ला असलेल्यांच्या ही बाब काही पचनी पडली नाही. 2009 च्या पंचवार्षिक निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर पुन्हा मोठी रणनीती आखली गेली. विरोधकांनी शंभूराज देसाई यांचा निसटता पराभव केला. कार्यकर्ते पराभवाची समीक्षा करण्यात व्यस्त असताना पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी शंभूराज देसाई यांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या. आज देखील शंभूराज देसाई यांचा मतदारसंघातील गावागावात निरंतर असलेला संपर्क ही एक मोठी बाजू आहे. कारखाना संपर्क कार्यालय, रविवार भेट, जनता दरबार, दिवाळी फराळ आदी. उपक्रम अखंड चालूच असतात. 2009 च्या अनपेक्षित पराभवाने शंभूराज देसाई व देसाई गटाने 2014 च्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कंबर कसली. या पंचवार्षिक निवडणुकीत शंभूराज देसाई यांच्या मायक्रो प्लॅनिंगने कमाल केली. विरोधक माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांचा तब्बल 18,824 मतांनी पराभव करत 2024-19 ला पाटण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना करोडो रुपयांचा विक्रमी निधी मतदारसंघात आणला.
शंभूराज देसाई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाचा मोठा फायदा पाटण तालुक्याला झाला. इतर कोणत्याही मतदारसंघापेक्षा जास्त निधी पाटण तालुक्यात आणला गेला. पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अशी रस्त्याची मांदियाळी गावागावात, डोंगरदऱ्यात पोहचली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार शंभूराज देसाई यांच्या मैत्रीचा प्रत्यय कारखानास्थळी झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील जनतेला आला. लोकनेते स्मारक, मरळीला कार्यक्रमात निधीची घोषणा जाग्यावर करत प्रशासकीय मान्यता नंतर घेतली. आ. शंभूराज देसाई यांना युतीतील सर्व मंत्र्यांनी विकासकामात सहकार्य केले. कोणतेही काम मंत्र्यांकडे असेल, तर ते पूर्ण होईपर्यंत आ. शंभूराज देसाई संबंधित मंत्री महोदयांचा पिच्छा पुरवून निधी पदरात पाडून घेत होते. ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभूराज देसाई यांच्या निधीच्या पाठपुराव्याबाबत गौरवोद्गार काढले होते. या काळात शंभूराज देसाई यांचे महत्व तालुक्यात मर्यादित न राहता शिवसेना पक्ष व युती सरकारमध्ये वाढू लागले. ते अभ्यासपूर्ण सरकारची बाजू भक्कमपणे मांडताना प्रसारमाध्यमांमध्ये दिसू लागले. कित्येक टी. व्ही. चॅनलमध्ये ते चर्चेत शिवसेनेची बाजू घेताना दिसत होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मर्जी संपादन करण्यात ते यशस्वी झाले. शिवसेना विधिमंडळ गटाच्या चर्चा, रणनीतीमध्ये उद्धव ठाकरे, विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे शंभूराज देसाई यांना आग्रहाने सहभाग देत होते. विधानसभा तालिकाध्यक्ष म्हणून अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक यांच्यात समतोल राखताना ते दिसत होते.
2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जाताना देसाई यांनी विकासकामांच्या विक्रमी निधीबाबत थेट विरोधकांना कारखानास्थळी चर्चेचे खुले आव्हान दिले होते. 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल अपेक्षित लागला. तालुक्यातील मतदारांनी विकासकामाला साथ दिली. शंभूराज देसाई यांनी विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांचा दुसऱ्यांदा 14,175 मतांनी पराभव करत जिल्हात ‘लाखात मी’ सिद्ध केले. जिल्हात एक लाखाहून अधिक मते मिळाल्याने शंभूराज देसाई यांच्या मंत्रिपदाचे वेध देसाई गटाला लागले. तीन वेळा साताऱ्यातून शिवसेनेसाठी प्रतिनिधीत्व केल्याने पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पक्ष बळकटीसाठी लाल दिवा मिळणार हे निश्चित मानले जात होते. परंतु, शपथविधीच्या आदल्या रात्रीपर्यंत निरोप न आल्याने देसाई गटात अस्वस्थता पसरली होती. रात्री 11.30 वाजता निरोप आला. शिवसेना विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी शंभूराज देसाई यांच्यासाठी खास आग्रह धरला होता. तसेच पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील शंभूराज देसाई यांचे महत्व चांगलेच माहीत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आपला नेता शपथ घेणार असल्याचे समजताच कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे मुंबईमधील रेसकोर्सच्या शपथविधी समारंभस्थळी पोहचले.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महविकास आघाडीचे अनैसर्गिक सरकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आले. मोठा पक्ष भाजप विरोधी पक्षात बसला. त्यानंतर महाविकास आघाडी टीकेचा विषय झाला. शंभूराज देसाई यांच्यावर गृहराज्यमंत्री खात्यासह सात खात्यांची, तसेच वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. महाविकास आघाडीचा सुरुवातीचा काळ करोनाचा होता. करोनाबाबत खबरदारी घेण्यासाठी शासनाचा ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रम लागू झाला. बऱ्याचदा मंत्रिमंडळाची बैठक ऑनलाईन होवू लागली. कार्यकर्ते, आमदार, मंत्री व मुख्यमंत्री संपर्क मर्यादित झाला. मात्र, काही नेते जिवावर उदार होत जनकार्य करत होते. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. शंभूराज देसाई सुद्धा नेहमीप्रमाणे मतदारसंघात सातत्याने संपर्कात राहत होते. पश्चिम महाराष्ट्रातील सेनेचे मंत्री म्हणून साहजिकच शंभूराज देसाई यांच्यावर विभागीय पक्ष जबाबदारी पण होती. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सतत मंत्रिमंडळाच्या ऑनलाईन मीटिंगच्या विषयावर विरोधी पक्षाने जोरदार टीका उठवली. याच दरम्यान ‘मिशन 100 वर महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष दिवसरात्र कार्य करत 2024 ला पक्षाचा मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत होता. करोना काळात मंत्रालयात ‘मिशन 100’ अविरत सुरू होते. सुरुवातीस हे मिशन एक गुपित होते.
परंतु, नंतर शिवसेना आमदारांना याचा अंदाज येवू लागला. शिवसेना आमदारांनी अनैसर्गिक महविकास आघाडी स्थापनेवेळीच विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजगी दर्शवली होती. परंतु, पक्षाचा मुख्यमंत्री होत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यावेळी राज्याच्या सर्वोच्चपदी विराजमान होत आहे, अशी समजूत काढत आमदारांना संयम ठेवण्यास सांगितले. ‘मिशन 100’ मध्ये मुख्यतः शिवसेना आमदार निशाण्यावर होते. छत्रपती संभाजीनगर, पैठणचे ज्येष्ठ नेते संदीपान भुमरे, सांगली-आटपाडीचे अनिल बाबर, सोलापूर-संगोल्याचे शहाजीबापू पाटील, नाशिक-नांदगावचे सुहास कांदे, मुंबई-प्रभादेवीचे सदा सरवणकर, सातारा-कोरेगावचे महेश शिंदे, रत्नागिरी-खेडचे योगेश कदम यांना प्रत्यक्ष अनुभव आला. तर इतर शिवसेना आमदारांना निधी वाटमध्ये सावत्रपणाच्या वागणुकीमुळे पराभवाचा अंदाज येत होता. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पराभूत विरोधी उमेदवारांना ‘मिशन 100’ अंतर्गत ताकद,ऊर्जा देण्याचे प्रयत्न जाहीररित्या केले जाऊ लागले. शिवसेना आमदारांत 2024 च्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीची धास्ती वाढली. आपले काय होणार? पक्षाचे काय होणार? याबाबतच्या चर्चा सामायिक होवू लागल्या. शिवसेना आमदारांना सदैव उपलब्ध असणारे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे या हक्काच्या माणसाकडे व्यथा मांडल्या जाऊ लागल्या. एकनाथ शिंदे यांनीही सदरची गंभीर बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली.
शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी वाटपाबाबत पक्षाचे आमदार व सर्व खात्यांच्या सचिवांची संयुक्त बैठक वर्षा बंगल्यावर बोलवली. बैठकीत इतर पक्षाचे आमदार व शिवसेना आमदार यांच्यातील निधीत तफावत हा मुद्दा वादग्रस्त ठरला. बैठकी दरम्यान शिवसेना आमदार व सचिव यांच्यात शाब्दिक चकमकही झाल्याचे वृत्त आहे. ना. एकनाथ शिंदे यांचे नगरविकास खाते सोडले, तर शिवसेना आमदारांना निधीचा मोठा प्रश्न होता.शंभूराज देसाई हे सुध्दा अर्थराज्यमंत्री म्हणून प्रयत्न करत होते. पण, त्यांना खूप मर्यादा होत्या. आगामी 2024 च्या निवडणुकीतील संभाव्य पराभव शिवसेना आमदारांना स्पष्ट दिसत होता. तरीही पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काहीच ठोस पावले उचलत नव्हते. काही शिवसेना आमदारांनी इतर पक्षाशी जुळवाजुळव सुरू केली होती. पक्षांतर केले तरी उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह होतेच? आता सर्व शिवसेना आमदारांनी विश्वासू व जुना सहकारी ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘आपणच काहीतरी पर्याय काढा’! असा तगादा लावला होता. शेवटी ठरले! जुने शिवसैनिक व शिवसेना पक्ष वाचवण्याचा. आणि तयारी झाली ती ‘सुरतेची’.
शिवसेनेमध्ये बंड काही नवीन नाही. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनी बंड केले होते. छगन भुजबळ, गणेश नाईक यांचे बंड महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याने घडवून आणत शिवसेना अनेकदा फोडली होती. परंतु, आता होणार होता तो ‘उठाव’, तोही शिवसेनाप्रमुखांची शिवसेना वाचवण्यासाठी. सर्व हालचाली गुप्त पद्धतीने सुरू झाल्या. आमदारांच्या बैठका सुरू झाल्या. या कानाची त्या कानाला खबर नव्हती. 20 जून 2022 ची विधानपरिषद निवडणूक पार पडली. रात्री 14 आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर जेवण करावयास गेले. त्यारात्री आमदारांचे मोबाईल फोन बंद झाले आणि टी. व्ही. चॅनेल, प्रसारमाध्यमांनी राज्यात खळबळ उडवून दिली. प्रसारमाध्यमे, तसेच राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांची मोबाईल तपासणी सुरू केली होती. शिवसेनेने इतर आमदारांबाबत दक्षता घ्यावयास सुरुवात केली. परंतु, सर्व व्यर्थ ठरले. शिवसेना आमदारांची मुस्कटदाबी व सावत्रपनाच्या वागणूकीने या उठावाला बळकटी दिली. पाहता-पाहता 40 शिवसेनेचे आणि दहा अपक्ष आमदार गुवाहाटीला पोहचले. यात गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांची खेळी, भूमिका व जबाबदारी महत्वाची होती. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या सन्मानाची ‘शिवसेना’ वाचवून परतफेड करण्याची हीच संधी शंभूराज देसाई यांना होती. देशाच्या राजकारणातच नाही, तर जगभरात हा ‘उठाव’ गाजला. आणि नियतीलाही हा उठाव मान्य झाला.
मतदारांच्या अपेक्षेतील युतीची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात आली. या नैसर्गिक युतीत शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा कडवट शिवसैनिक ‘एकनाथ’ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पाचवा मुख्यमंत्रीपदाचा मान सातारा जिल्हाला मिळाला. शिवसेना संसदीय विधिमंडळ (खासदार), राज्यातील शिवसेना नेते, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, देशातील राज्यप्रमुख, राज्य संपर्कप्रमुख यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनीही नेतृत्व मान्य केले. नवीन सरकारमध्ये बऱ्याच मंत्र्यांची खाती कायम ठेवण्यात आली. परंतु, शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देत राज्याच्या तिजोरीस हातभार लावणारे महत्वाचे ‘उत्पादन शुल्क’ खाते देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्हाचे, तसेच शंभूराज देसाई यांना घरच्या सातारा जिल्हाचे पालकमंत्री पद देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ठाणे जिल्हाचा पालकमंत्री निवडताना ना. शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास दाखवला. यावरून ना. देसाई यांच्या ‘पॉवर’चा अंदाज संपूर्ण महाराष्ट्राला आला.
नवीन युती सरकारचा कारभार सुरू झाला. भाजप-शिवसेना जुने सहकारी परत एकत्र आले. सर्व आलबेल सुरू झाले. शिंदे गटाचा पहिला ‘दसरा मेळावा’ संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ‘उठावा’ची पाश्र्वभूमी शिवसैनिकांना सविस्तर सांगितली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यापेक्षा शिवसैनिक जवळचा वाटायचा. ते नेहमी सांगायचे, शिवसेनेचे शक्तिस्थान हा शिवसैनिक आहे. मुख्यमंत्री पक्षाचा असून देखील स्थानिक राजकारणात दुय्यम स्थानाचा असंतोष शिवसैनिकांत होता. सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचे उदाहरण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांच्या भावनांना हात घातला. वांद्रे-कुर्ला संकुलातील भरगच्च मैदानात शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत एकनाथ शिंदे व सहकाऱ्यांच्या ‘उठावा’चे स्वागत केले. कालांतराने निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत मान्यता दिली. शिवसेनाप्रमुखांचा वाघ व धनुष्यबाण हा ठाण्याचा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे अशा कडवट शिवसैनिकाला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठा निर्णय घेत 964 कोटी 15 लाख रुपयांची संपूर्ण कर्जमाफी करत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला.
शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत युतीला मोठे यश मिळाले. युतीला मतदारांचा प्रतिसाद वाढत चालला होता. ‘धडाकेबाज’ निर्णय ही एकनाथ शिंदे यांची ओळख झाली. विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले. विधानसभा अधिवेशन असो वा विशेष सत्र असो, विरोधक मुख्यमंत्र्यांवर तुटून पडत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मागील बाकावर बसलेले शंभूराज देसाई विरोधकांचा हल्ला परतावून लावत होते. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, जयंत पाटील व शंभूराज देसाई यांच्यात शाब्दिक चकमक उडताना महाराष्ट्र पाहत होता. युती सरकारने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम जाहीर केला. विशेष म्हणजे याचा दिमाखदार ‘शुभारंभ’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाटण तालुक्यातून झाला. जनतेची कामे करण्यासाठी राज्यभर सरकारी कर्मचारी जनतेच्या दारात पोहचत होते.
एकट्या पाटण तालुक्यात ……. जणांना याचा लाभ झाला. तिकडे विरोधी पक्ष राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढल्याचे वृत प्रसारमाध्यमांमध्ये दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड झाली. येथूनच ही वादाची ठिणगी पडली. अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चाललेल्या मुस्कटदाबीने पुन्हा एकदा राज्यात बंड उडवून दिले. अजितदादा पवार गट सत्तेत सहभागी झाला. अजितदादा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याने विरोधकांची ई.डी., गद्दार, खोके या शब्दांचा वापर करायची गोची झाली. यावर्षीच्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समक्ष शपथ घेत ‘मराठा आरक्षण मी मिळवून देणारच’ अशी खात्री मुख्यांत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिली. गरीब, मराठा शेतकरी कुटुंबातून वर आलेल्या एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण चळवळीस केलेले सहकार्य मराठा चळवळ अभ्यासक सांगतील. आता तर ते मुख्यमंत्री असल्याने मराठा समाजाने त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे, काही गैर नाही. मराठा आरक्षणावर मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधाभास निर्माण करणारे चिथावणीखोर विधान केल्याने मंत्री शंभूराज देसाई यांनी भुजबळांना खडेबोल सुनावले. तसेच अजितदादांना भुजबळांना समज देण्यास सांगितले. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार हे आरक्षणाबाबत किती संवेदनशील आहेत, हे समजते. पुढील वर्षीच्या 2024 च्या पंचवार्षिक निवडणुकीची सर्वच राजकिय पक्षांची रणनीती सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच जाहीर घोषणा केली आहे की, माझ्यासोबत आलेला एकही आमदार पराभूत होणार नाही. तशी रणनीतीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडूनही सुरू आहे. गुवाहाटीत जगाचा अंदाज खोटा ठरवत मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डावपेच लवकरच महाराष्ट्राला दिसतील. पुढील 2024 च्या रणनीतीची जबाबदारी निवडक मुख्य नेत्यांसह आपल्या विश्वासू पाटणच्या शंभूराज देसाईंवर टाकली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात ‘पॉवरफुल’ असलेल्या शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात देखील आपला राजकीय वचक चढता ठेवला आहे. तब्बल 60 वर्षानंतर विविध कृषी सेवा विकास सोसायटीत सत्तांतर करत सातारा जिल्हा बँकेत पुढचा संचालक कोण असणार? हे सातारा जिल्हाला कळवले आहे. 40 वर्षानंतर पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर करताना असा ‘मास्टर स्ट्रोक’ हाणला आहे की, विरोधक अजूनही पराभवाची कारणे शोधत बसले आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत कट्टर विरोधक काँग्रेस प्रांतिक सदस्य (मंद्रुळ कोळे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख (मल्हारपेठ) यांच्या घरच्या ग्रामपंचायतीत सत्तांतर करत विरोधकांना राजकीय ‘बेघर’ करून टाकले. तालुक्यातील 235 ग्रामपंचायतींपैकी 165 ग्रामपंचायती ताब्यात ठेवत विजयाची सलग ‘तिसरी सलामी’ देण्याची फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे.
आजकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील कामकाजातून वेळ काढत सारखे सातारला दिसतात. मागेयापाठी बरीच गणिते आहेत. पर्यटनातून सातारच्या डोंगरी सौंदर्याचा कायापालट करण्याचा त्यांचा मानस आहे. मागील महिन्यात दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी हेलिकॉप्टरमधून संपूर्ण निरीक्षण करत सातारा जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन पूरक सूचना मागवल्या आहेत. कोयना धरण बॅकवॉटरमध्ये लवकरच जल बोटिंग देखील सुरू होत आहे. वॉटर स्पोर्ट्सचा थरार स्कुबा डायव्हिंगसाठी देखील तज्ञांकडून सूचना मागवल्या आहेत. जावली तालुक्यात तापोळा येथे सी-लिंक पूलाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली आहे. पुलाच्या मधोमध उंचावर जागतिक दर्जाची ‘पर्यटक गॅलरी’ निर्मिती होणार आहे. एकंदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यटनास अनुकूल दिसत असल्याने ‘भांडवलशाही’ देखील पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हात पर्यटनाचा लाभ हा ‘पाटण’ तालुक्यास आधिक प्रमाणात होणार आहे. 2009 च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई यांचा ‘भांवलशाही’च्या सहकार्यातून विरोधकांनी केलेला पराभव पाटणच्या डोंगरांवर उमटला.
शंभूराज देसाई यांच्या गैरहजेरीत भांडवलशाहीने डोंगर पठारावर अक्षरशः हैदोस घातला. पठारावर सोसाट्याच्या नैसर्गिक वाऱ्यात राहणाऱ्या जनतेला कुत्रिम हवेच्या क्रांतीची स्वप्नं दाखवली. भोळ्या जनतेच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी करत 20-22 वर्षात बक्कळ पैसा कमावला. या गरिबांच्या फसवणुकीत एक पैशाचे नाव नसलेल्या शंभूराज देसाई यांची आज त्या ‘औद्योगिक’ आणि ‘रोजगार’ क्रांतीत न्हाऊन निघालेल्या गावांत सत्ता आहे. 2009 ला झालेल्या एका चुकीने डोंगरातील जनता आजही “पश्चाताप” करत आहे. पाटणच्या भोळ्या जनतेवर नेहमी भांडवलदारांचे लक्ष असते. शंभूराज देसाई यांना पर्यटनाचा ‘खलनायक’ एवढाच प्रचार सध्या भांडवलदार व विरोधकांचा दिसतो. परंतु, सातारा जिल्हातील पर्यटनासाठी कोण आग्रही आहे? हे सांगायला नको. हवे तर विचारा मुख्यमंत्र्यांना! आता एकनाथ शिंदे यांच्या पाटणच्या ‘पॉवर’ पुढे त्यांचे काही चालणार नाही. हे यांनी ओळखले आहे. शंभूराज देसाई यांची बदनामी ही निवडणुकीच्या सुरुवातीस दोन महिने बाहेर पडून करणे व नशीब फळते का पाहणे? नाहीतर आपला उद्योग बरा, ही एक विरोधकांची ठरलेली खेळी असते. महाराष्ट्रात देखील या ‘पॉवर’ला अलीकडे एका महिलेला पुढे करत ड्रग्स प्रकरणात बदनाम करण्याचे छडयंत्र केले होते. परंतु, तिला न्यायालयात खेचत या प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचे राज्याला दाखवले. असो राजकारणात आरोप हे नेहमीच शक्तिस्थळवर केले जातात. स्वच्छ राजकीय चरित्र असलेल्या ना. शंभूराज देसाई यांचे आजचे राज्यातील वजन हीच पाटणच्या जनतेची खरी ताकद आहे. त्याचा फायदा पाटणची जनता नक्की करेल.