पुणे – शहरासाठी समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत शहरभर नव्याने जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यानंतरही तब्बल साडेसात टीएमसी पाण्याची गळती होत असल्याची कबुली खुद्द महापालिकेने दिली आहे. हे नासाडी होणारे पाणी रोखल्यास पुणेकरांना सुमारे सहा महिने पाणीपुरवठा करता येऊ शकेल.
महापालिकेने शहराच्या पुरवठ्यासाठी 2023-24 वर्षाचे पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्या अंतर्गत जलसंपदा विभागाकडे 20.90 टीएमसी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. यात या गळतीचा उल्लेख करण्यात आला आहे. हे प्रमाण एकूण पाण्याच्या 35 टक्के आहे. महापालिकेचा पाणी वापर मंजूर कोट्यापेक्षा अधिक असल्याने शेतकऱ्यांनी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर महापालिकेने दरवर्षी जलसंपदा विभागास पाण्याचे अंदाजपत्रक सादर करावे, असे आदेश नियामक प्राधिकरणाचे दिले आहेत. त्यानुसार मागील दोन वर्षांपासून जुलैच्या सुरूवातीलाच हे अंदाजपत्रक सादर केले जाते.
समान पाणीपुरवठा योजना सध्या अपूर्ण आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेने पूर्णपणे नळमीटरही बसवले नाहीत. या योजनेमुळे काही प्रमाणात पाणीगळती रोखण्यात यश येत असले, तरी एकूण पाण्याच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात पालिकेने साडेतीन टीएमसी पाणी गळतीत नमूद केले होते. मात्र, जलसंपदा विभागाने 10 टक्केच गळती गृहीत धरत हे पाणी केवळ सव्वा टीएमसीच मंजूर केले होते. मात्र, यावर्षी अंदाजपत्रक पाठविताना 35 टक्के गळती दाखविल्याने जलसंपदा विभागाकडून महापालिकेस नेमके किती पाणी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे
72 लाख लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी
56 लाख शहराची गृहीत लोकसंख्या
10 लाख 34 गावांची लोकसंख्या
4 लाख शहराची तरल लोकसंख्या
लोकसंख्येनुसार 13.57 टीएमसी पाण्याची मागणी
गळती 7.33 टीएमसी गृहीत धरता, 20.90 टीएमसी पाण्याची मागणी