– माधव विद्वांस
दशावतारी व्यक्तिमत्त्वाचे लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, इतिहास संशोधक, विचारवंत, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि “गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक सेतु माधव पगडी यांचा आज स्मृतिदिन. सेतु माधव पगडी यांचा जन्म तत्कालीन निजाम राजवटीत बिदर जिल्ह्यातील व आताच्या लातूर जिल्ह्यातील निलंगा या तालुक्याच्या गावी 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गुलबर्गा आणि उस्मानाबाद येथे झाले. त्यानंतर ते 1925 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयात पहिल्या क्रमांकाने पास होऊन रायचंडी प्रसाद सुवर्णपदक मिळविले. वर्ष 1932 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून एमए च्या वर्गात राज्यशास्त्र विषयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
त्यानंतर त्यांची वर्ष 1933 मध्ये तहसीलदार पदावर नियुक्ती झाली. त्यांची मामलेदार, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, सचिव अशा चढत्या क्रमाने पदोन्नती होत गेली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव आणि “महाराष्ट्र जिल्हा गॅझेटिअर’चे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सनदी नोकरीमध्ये आणि इतिहास संशोधन आणि लेखन यामध्ये व्यतीत केले. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत ते औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी व हैदराबाद संस्थानात सनदी अधिकारी होते. त्यामुळे त्यांना मराठे व निजामशाही यांची विस्तृत माहिती गोळा करता आली. ते बहुभाषिक होते. त्यांना इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड तसेच गोंडी, कोलमी या आदिवासी भाषा अवगत होत्या. त्यामुळे त्यांना इतिहास संशोधन व लेखन यात त्याचा उपयोग झाला. त्यांची प्रशासकीय सेवेत अनेक जिल्ह्यांत बदली झाली. त्यामुळे त्यांनी जातील तेथे ऐतिहासिक ठिकाणे, दस्त यांचा अभ्यास केला. त्यावर त्यांनी टिपणे तयार केली.
मुख्यत्वेकरून त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर संशोधन व लेखन केले. त्यांनी महाराष्ट्र संस्कृती, मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्रातील धर्म, समर्थ संप्रदाय, सूफी संप्रदाय, शिवचरित्र पेशवे-निजाम संबंध या विषयांवर विस्तृत लेखन केले. त्यांचे लेखन ऐकीव कथेवर आधारित नव्हते, तर प्रत्यक्ष पुराव्यावर असल्याने हे संशोधनात्मक पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले.
हिंदवी स्वराज्य आणि मोगल या पुस्तकांमधून मराठ्यांच्या इतिहासातील इ.स. 1680 ते 1707 या कालखंडातील स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास विस्तृतपणे त्यांनी मांडला आहे. सेतु माधवराव पगडी यांनी मराठा घराण्यांच्या नात्या-गोत्यांचे अनेक तपशील, तसेच तत्कालीन महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सामाजिक गोष्टींचा मागोवाही त्यांनी घेतला आहे.त्यांनी उर्दू चांगले येत असल्याने शायर इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा, मराठी वाचकांना दिलेली मोठी भेट आहे. त्यांचे लेखन कादंबरीस्वरूप नाही तर इतिहासाच्या अभ्यासकाला दीपस्तंभासारखे आहे. भारत सरकारने इ.स. 1991 मध्ये “पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. त्यांचे निधन 14 ऑक्टोबर 1994 रोजी झाले.