मुंबई – राज्यातील मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबर रोजी संपणार आहे. आज 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभेसाठी बीडमधील शाळांना सुट्टी देण्यात आल्याचे म्हणत राज्यातील मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचे कारण काय ? असा सवाल उपस्थित केला आहे.
मनोज जरांगे हे सध्या मराठा आरक्षणासाठी ( Maratha reservation ) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी विरोधात्मक मागणी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी लावून धरली आहे. अशात भुजबळांनी सोशल मीडियावर जिल्हाधिकाऱ्यांचे एक पत्र शेअर करत बीड जिल्ह्यातील शाळांना जरांगेच्या सभेसाठी सुट्टी दिल्याचे म्हंटले आहे.
कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचे कारण काय ? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. ट्विटमध्ये भुजबळ म्हणतात,”कोणत्याही सभा, मेळावे यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं किंवा सुट्टी जाहीर करणं नक्कीच चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात होणार असलेल्या मनोज जरांगे यांच्या सभेमुळे जिल्हा परिषदेने आपल्या प्राथमिक शाळांना थेट सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक काढले होते. त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर रात्री उशिरा ती सुट्टीची सूचना मागे घेण्यात आली. त्याविरोधात मी जाहीर सभा, प्रसारमाध्यमे आणि विधानभवनातही आवाज उठवला होता.”
भुजबळ पुढे म्हणतात,”आता पुन्हा बीड जिल्ह्यात जरांगे यांच्या सभेसाठी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. हे या राज्यात नेमकं काय सुरू आहे? पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभांच्या दिवशी देखील अशा प्रकारे शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी ही विशेष व्यवस्था कशासाठी? मराठा आरक्षणाला किंवा त्यासाठी सुरू असलेल्या सभांना माझाच काय, कोणाचाही विरोध नाही. परंतु ही झुंडशाही, हुकूमशाही सुरू आहे, त्याला मात्र नक्कीच विरोध आहे. मराठा समाजातील सुज्ञ बंधू-भगिनींना देखील हे अजिबात पटणार नाही. यातून आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न करतोय? एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतंय का? असं असेल तर हे निश्चितच लोकशाहीला धरून नाही”
कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचे कारण काय?
कोणत्याही सभा, मेळावे यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं किंवा सुट्टी जाहीर करणं नक्कीच चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात होणार असलेल्या मनोज जरांगे यांच्या… pic.twitter.com/ZfvvcvJVpx
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 23, 2023
शालेय शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. नसता महाराष्ट्रातील इतर समाजांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे. असं देखील भुजबळांनी यावेळी म्हंटले आहे.