ट्रक पळवून नेताना घडली घटना; नागरिकांनी पाठलाग करून चालकास पकडले
कराड – पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादात मालट्रक पळवून नेताना ट्रकच्या मालकालाच ठोकरल्याची घटना मलकापूर (ता. कराड) येथे घडली. यात ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने गाडीमालक विष्णू शिवाजी हजारे (वय 35, रा. अहिल्यानगर, मलकापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
मलकापूर येथील गंधर्व हॉटेलशेजारी असलेल्या पार्किंगतळावरून मालट्रक पळवून नेताना रविवार, दि. 14 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, मलकापूर येथे महामार्गालगत गंधर्व पॅलेस हॉटेल आहे. त्याशेजारी गावडे यांच्या जागेत पार्किंग तळ व काही दुकाने आहेत. त्यात विष्णू हजारे यांचे काही वर्षांपासून जयहिंद मोटर नावाचे गॅरेज आहे. हजारे यांनी कांही महिन्यापूर्वी मालट्रक घेतला होता. रविवारी दुपारी मालट्रक गॅरेजशेजारी उभा करून हजारे गॅरेजमधील काम करत होते.
हजारेबरोबर झालेल्या आर्थिक व्यवहारातील रक्कम मागण्यासाठी रेठरे (ता. कराड) येथील अक्षय गावडे, रणजित पाटील यांच्यासह चार ते पाच जण हजारे यांच्या गॅरेजमध्ये आले. त्यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीमधून बाचाबाची झाली. यावेळी अक्षय गावडे याने पैसे दे अन्यथा ट्रक ओढून नेतो, असे म्हणत मालट्रकमध्ये (एमएच 10 एडब्ल्यू 7574) बसून ट्रक सुरु केला. यावेळी ट्रक कसा नेतोच बघूच, म्हणून त्याला अडवत हजारे मालट्रकचा स्विच बंद करण्यासाठी गेला.
नेमका त्याचवेळी अक्षय गावडे याने मालट्रक पळवला. या गडबडीत हजारे यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पार्किंगतळ मालक पोलीस पाटील प्रशांत गावडे यांच्यासह नागरिक घटनास्थळी धावले. तत्पूर्वी घटना चालक अक्षय गावडे व त्याच्यासोबत आलेले सर्व जण घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करत अक्षयला पकडले.
घटनेची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यात दिल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजीराव विभुते, पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे, प्रवीण जाधव, हवालदार धिरज चतूर यांच्यासह कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठवून दिला. घटनेची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.