एन. अशोक; वाईच्या किसन वीर कॉलेजमध्ये मनोरंजनपर कार्यक्रम
वाई – सध्याच्या काळात ताणतणाव हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. बदलती जीवनशैली आणि नियमित व्यायामाच्या अभावामुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देत आहोत आणि त्यातून बरे होण्यासाठी दवाखान्यात जात आहोत. गोळ्या, औषधात सुख-समाधान शोधत आहोत; परंतु सुखी आणि आरोग्यदायी जीवनासाठी खळखळून हसणे, हेच सर्वोत्तम औषध आहे, असे मत कोल्हापूर येथील कलावंत, लेखक व सामाजिक कार्यकर्ते एन. अशोक यांनी व्यक्त केले.
येथील जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई स्टाफ अॅकॅडमी आणि स्टाफ वेल्फेअर समितीच्यावतीने झालेल्या ‘तणावमुक्त जीवनासाठी हास्य मैफिल’ या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून श्रोत्यांना खळखळून हसवताना, सामाजिक बांधिलकीचा संदेशही दिला. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे अध्यक्षस्थानी होते. विवेक सुपेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
एन. अशोक म्हणाले, खळखळून हसल्याने सुख, समाधान व चैतन्य निर्माण होते. आत्मविश्वास वाढतो. सुख व आनंद पैशांनी खरेदी करता येत नाही. आई-वडिलांबरोबर राहणारी व्यक्ती जगात सर्वांत श्रीमंत असते. आई-वडील आणि कुटुंबाला आनंदी ठेवले पाहिजे. शक्य असेल तेवढे सामाजिक कार्य केले पाहिजे. मी आतापर्यंत 84 निराधार कुटुंबांमधील मुलांना दत्तक घेतले आहे. ‘चला हसण्याच्या गावी जाऊ’ या कार्यक्रमाच्या मानधनातून या मुलांचे पालन पोषण करत आहे.
प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस मोकळेपणाने हसणे विसरत चालला आहे. मानवी जीवनात अनेक चढउतार, अडीअडचणी, सुखदुःखाचे प्रसंग येतात. त्यामुळे आपण तणावग्रस्त जीवन जगत आहोत. याचा परिणाम आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होतो. त्यामुळे निरोगी व आनंदी जीवनासाठी मनसोक्त हसले पाहिजे. हसण्यामुळे कौटुंबिक वातावरणदेखील आनंदी राहते. भूगोल विभागप्रमुख आणि स्टाफ अॅकॅडमीचे समन्वयक प्रा. डॉ. विनोद वीर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. स्टाफ वेल्फेअर समितीचे समन्वयक डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविक करून, आभार मानले.