उंब्रज – शिवडे, ता. कराड येथे नव्याने स्थापन झालेल्या महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढीचे उद्घाटन ज्ञानभास्कर सद्गुरू महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांच्या हस्ते नुकतेच झाले.
कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाच्या उपसचिव सौ. मंजुषा कारंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उपनिबंधक संदीप जाधव, सहाय्यक उपनिबंधक जे. पी. शिंदे, नायब तहसीलदार महेश उबारे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव राजेंद्र शेजवळ, नायब तहसीलदार सुनीलकुमार शेटे, पतपेढीचे चेअरमन प्रमोद देशमाने, व्हाइस चेअरमन सौ. उज्ज्वला उबारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवाचार्य महाराज म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी अध्यात्म आणि अर्थकारणाची सांगड घालून समाजोन्नतीचा संदेश दिला. त्यांच्या नावाने सुरू झालेली महात्मा बसवेश्वर पतपेढी समाजातील गरजूंच्या उपयोगी पडेल. ही पतपेढी सामान्य माणसांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवेल. महात्मा बसवेश्वरांनी समता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. जीवनात समृद्धी, स्थैर्य आणि शांतता महत्त्वाची आहे. पैशातून समृद्धी आणि अध्यात्मातून मन:शांती मिळते. या दोन्हींचे संतुलन साधण्यासाठी पैशांचा विनियोग योग्य पद्धतीने करावा. महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढीने गरजू सभासदांना कर्ज द्यावे. त्या कर्जाच्या रकमेचा विनियोग योग्य त्या कार्यासाठी व्हावा आणि त्यातून सभासद व पतसंस्थेचा विकास व्हावा.
सौ. मंजुषा कारंडे म्हणाल्या, कोणत्याही संस्थेची प्रगती ही त्या संस्थेत काम करणाऱ्या लोकांचे विचार आणि विश्वासावर अवलंबून असते. महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढीच्या माध्यमातून या परिसरातील लोकांना चांगल्या आर्थिक सुविधा मिळणार आहेत.शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या माध्यमातून परिसराचा विकास साधावा. यावेळी उपनिबंधक संदीप जाधव यांनी संस्था चालवताना कोणती काळजी घ्यावी आणि संचालक मंडळाने पतसंस्थेच्या विकासासाठी कशा पद्धतीने पारदर्शकता राखावी, याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ राजेंद्र शेजवळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रकाश मुसळे, संजय कदम, संजय मोरकळ, आनंदराव साळुंखे, कैलास अर्जुगडे, निवास थोरात, संजीव साळुंखे (कलेढोण), ज्ञानेश कळसकर, अजित गायकवाड, संदीप चव्हाण दिलीप कदम, कृष्णात पाटील, ज्ञानेश्वर कदम, किशोर चव्हाण, प्रसाद देटके, हणंमतराव पाटील, राजीव रावळ, सुरेश भोसले, अमित जाधव, प्रकाश कांबिरे, पंचक्रोशीतील मान्यवर, समाजबांधव, ठेवीदार, कर्जदार, पिग्मी एजंट, पिग्मी खातेधारक, सभासद कार्यक्रमास उपस्थित होते.
पतसंस्थेच्या उभारणीत सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. उमा कळसकर, मनीषा वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले, संजय शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. कांतिलाल जगदाळे यांनी आभार मानले.