मुंबई – अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्याचे सत्र कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून चालू असल्याने त्याची सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबई पोलिसांकडून सलमानला वाय दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. एका मुलाखतीमध्ये सलमानने मुंबईपेक्षा दुबईमध्ये जास्त सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले होते. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सलमान खानला मुंबईत किंवा भारतात कुठेही अडचण येणार नाही. त्याला पूर्ण सुरक्षा देण्यात आली आहे. सलमान खानची सुरक्षा सर्वोच्च पातळीची आहे. त्याला मुंबईत किंवा भारतात कुठेही फिरायला हरकत नाही. मुंबईपेक्षा सुरक्षित जागा नाही असं मला वाटतं.”
VIDEO: “There is no problem for him (Salman Khan) in Mumbai or anywhere in India. He has been given full security,” says Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis on security threat to Bollywood actor Salman Khan. pic.twitter.com/ZNGHWwc17P
— Press Trust of India (@PTI_News) May 2, 2023
दरम्यान, सलमानच्या सुरक्षितेबाबत अभिनेत्री कंगणा राणावतने देखील भाष्य केले होते. ‘आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री थोर आहेत. सलमान खान यांना जी सुरक्षा मिळाली आहे, ती केंद्र सरकारनं दिली आहे. ज्याची सुरक्षा खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शाह करत आहेत, त्यामुळे त्याने काळजी करू नये. त्याची चांगली सुरक्षा राखली जात आहे. त्याला काहीही होणार नाही. आता देश सुरक्षित लोकांच्या हातात आहे. मोदी असल्यावर तुला काळजी करण्याची गरज नाही,” असे कंगणा म्हणाली होती.
काय म्हणाला होता सलमान खान ?
सलमानने एका मुलाखतीत म्हंटले होते की, “मी जिथं जातो तिथं संपूर्ण सुरक्षा घेऊन जातो. जेव्हा मी दुबईत असतो तेव्हा मी थोडा निर्धास्त असतो. भारतात असतो तेव्हा काही अडचणी असतात. अर्थात जे व्हायचं आहे ते होणारच आहे. परंतु देवावर माझा विश्वास आहे. याचा अर्थ असा नाही मी बाहेर मोकळेपणानं फिरायला सुरुवात करेन. रस्त्यावर सायकल चालवणं आणि कुठेही एकट्यानं जाणं माझ्यासाठी कठीण होऊन बसलं आहे.”
“जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये फसतो, तिथे तर जास्तच सुरक्षा असते. आणि मग आजुबाजूला असलेल्या गाड्या दुसऱ्या लोकांना अडचण निर्माण करतात. मग ते लोक मला तिरकस लूक देतात. अर्थात माझे ते सगळे चाहतेच असतात. पण माझ्या जीवाला धोका असल्याने ही सगळी सुरक्षा केली आहे.”