नवी दिल्ली – अमेरिकेतील वाढलेले व्याजदर आणि आखातातील युद्ध या कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातून विक्री चालू असून नोव्हेंबरच्या पहिल्या तीन दिवसांत या गुंतवणूकदारानी तब्बल 5,800 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला.
ऑक्टोबर महिन्यातही या गुंतवणूकदारांनी 24,548 कोटी रुपये काढून घेतले होते. तर सप्टेंबर महिन्यात 14,767 कोटी रुपये काढून घेतले होते. जोपर्यंत अमेरिकेतील व्याजदर कमी होणार नाही तोपर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक कमी पातळीवर राहण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्या अगोदर मार्च ते ऑगस्टदरम्यान मात्र भारतातील परिस्थिती चांगली होती. अमेरिकेत व्याजदर वाढ झाली नव्हती. या सहा महिन्यात भारतात या गुंतवणूकदारांनी तब्बल 1.74 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर अमेरिकेत व्याजदर वाढ सुरू झाली. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्ध आणि आखातातील युद्ध असे जागतिक पेच प्रसंग निर्माण झाले आहेत.
गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा आश्रय घेत आहेत. अशा परिस्थितीत भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशातून गुंतवणूक काढून ती अमेरिकेचे कर्जरोखे, डॉलर किंवा सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे अमेरिकन कर्जरोख्यावरील परतावा सध्या विक्रमी पातळीवर गेला आहे. सोन्याचे दर वाढले आहेत. जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाल्यानंतर व डॉलर महागल्यानंतर भारताला आयात महागात पडते.
आशावादाला जागा
सुदैवाची बाब म्हणजे गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या व्याजदरात वाढ झाली नाही. नजीकच्या काळात व्याजदरात वाढ करण्याची गरज भासणार नाही असे सुचित करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात काही प्रमाणात अशावादी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे मुख्य गुंतवणूक अधिकारी व्ही के विजयकुमार यांनी सांगितले.