युद्धाचे भाकित करणाऱ्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची सध्या चर्चा आहे. भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, 2020 मध्ये गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात आलेल्या प्रचंड मोठ्या टोळधाडीचे भाकित बाबा वेंगा यांनी केले होते. या टोळधाडीत मोठ्या प्रमाणावर धान्याची नासाडी झाली होती. पृथ्वीवर जीवनाचा शोध घेण्यासाठी ओमुआमुआ नावाच्या लघुग्रहावरून एलियन्स 2022 मध्ये पृथ्वीवर पाठविले जातील, असेही त्यांनी म्हटले असल्यामुळे जगाला त्याचेही कुतूहल आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेक विषयांना तोंड फुटले. जग तिसऱ्या महायुद्धाकडे जात आहे का? तसेच अणुयुद्ध होईल का? झालेच तर काय होईल? रशियाविरुद्ध नवी आघाडी आकार घेईल का? त्या आघाडीत कोण-कोण असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. या सर्वांमध्ये एका प्रश्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. तो प्रश्न म्हणजे, बाबा वेंगा यांनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरणार का? त्यापाठोपाठ युद्धे आणि त्याविषयी वेळोवेळी केली गेलेली भाकिते, नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी या गोष्टी पुढे आल्याच; परंतु बाबा वेंगा कोण आणि त्यांनी केलेली भविष्यवाणी नेमकी काय आहे, याबाबत विशेषत्वाने चर्चा सुरू झाली. बाबा वेंगा या बल्गेरियातील दिवंगत भविष्यवेत्त्या आहेत आणि रशिया तसेच पुतीन यांच्याबाबत त्यांनी केलेली विशिष्ट विधाने सध्या चर्चेत आहेत. रशिया हा जगाचा शासक बनेल आणि मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला रशिया दूर करेल, असे भविष्य त्यांनी 1979 मध्ये वर्तविले होते, असे सांगितले जाते. बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का?
बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत, असे सध्या सर्वत्र चर्चिले जात आहे. अमेरिकेवर अल् कायदाने 11 सप्टेंबर 2001 रोजी केलेला हल्ला ते त्सुनामी अशी अनेक भाकिते त्यांनी केली होती असे म्हणतात. अर्थात, काही लोकांचे असेही म्हणणे आहे की, बाबा वेंगा यांनी नवर्तविलेली भाकितेही त्यांच्या अनुयायांकडून अनेकदा सांगितली जातात. त्या गोष्टी बाबा वेंगा यांनी आपल्याला सांगितल्या होत्या, असे अनुयायांचे म्हणणे असते. वस्तुस्थिती काहीही असली तरी सध्या बाबा वेंगा यांचे एक वक्तव्य गंभीरपणे चर्चिले जात आहे. त्यांनी म्हटले होते की, रशिया जगाचा शासक बनेल आणि युरोपची भूमी ओसाड होईल. रशियाने युक्रेनवर ताबा मिळवला तर युरोपला आपल्या भवितव्याची चिंता वाटते, हे वास्तव आहेच.
बाबा वेंगा असे म्हणाल्या होत्या की, सर्वकाही वितळून जाईल कारण बर्फ अस्पर्श राहील- व्लादिमीर यांची शान, रशियाची शान! युद्धाच्या आणि जगाच्या भवितव्याबाबत एकीकडे गंभीर चर्चा होत असताना दुसरीकडे बाबा वेंगा यांच्या या वक्तव्याचा अर्थ आपापल्या परीने लावण्याचा प्रयत्नही अनेकजण करीत आहेत. रशियाला कोणी रोखू शकणार नाही, सर्व लोकांना मार्गातून हटविले जाईल आणि मग रशिया जगावर राज्य करेल, असे हे भाकित आहे. बाबा वेंगा यांचे मूळ नाव वेंगेलिया गुश्तेरोवा असे असून, 1911 मध्ये त्यांचा जन्म बल्गेरियात झाला होता. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले.
ईश्वराने आपल्याला भविष्य पाहण्याची दिव्य दृष्टी दिली आहे, असा त्यांचा दावा होता. वयाच्या 12 व्या वर्षी एका वादळात त्यांनी डोळे गमावले. असे सांगतात की त्यांनी स्वतःच्या मृत्यूचीही अचूक तारीख आधीच सांगून ठेवली होती. ज्यावेळी त्या गेल्या, तत्पूर्वी त्यांनी 5079 सालापर्यंतचे जगाचे भविष्य सांगितले. 5079 मध्ये जगाचा अंत होईल, असे त्यांनी सांगितले आहे. सोव्हिएत संघाच्या विघटनाची जशी त्यांनी भविष्यवाणी केली होती, तशीच 2004 ची त्सुनामी, ब्रिटनच्या राजकुमारी डायना यांचा मृत्यू अशी भाकितेही आधीच केलेली होती. 2022 हे वर्ष नैसर्गिक आपत्तींचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, 2020 मध्ये गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात आलेल्या प्रचंड मोठ्या टोळधाडीचे भाकित त्यांनी केले होते. या टोळधाडीत मोठ्या प्रमाणावर धान्याची नासाडी झाली होती. पृथ्वीवर जीवनाचा शोध घेण्यासाठी ओमुआमुआ नावाच्या लघुग्रहावरून एलियन्स 2022 मध्ये पृथ्वीवर पाठविले जातील, असेही त्यांनी म्हटले असल्यामुळे जगाला त्याचेही कुतूहल आहे.
जगात ज्या ज्यावेळी मोठ्या घटना घडल्या आहेत, त्या त्यावेळी त्यांचा संबंध नॉस्ट्रेडॅमस आणि बाबा वेंगा यांच्यासारख्या भविष्यवेत्त्यांनी नोंदविलेल्या भाकितांशी जोडला जातो. युक्रेन आणि रशियातील युद्धाकडे अनेक देश तिसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ म्हणून पाहत आहेत. असे बोलले जात आहे की, जगात ज्यावेळी एखादी मोठी रोगाची साथ येते, त्यापाठोपाठ मोठे युद्ध किंवा महायुद्ध होते. नॉस्ट्रेडॅमस आणि बाबा वेंगा यांच्यासारख्यांची भाकिते आणि महायुद्धे तसेच मोठे साथरोग यांचे काय कनेक्शन आहे, हे तपासून पाहायला हवे.
भविष्यवाणीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा असा युक्तिवाद आहे की, मोठ्या युद्धानंतर वातावरणात विषारी प्रभाव पसरलेला असतो. त्याचा परिणाम म्हणून रोगराई पसरते. परंतु रोगराईनंतर महायुद्ध झाले तर…? याचे उत्तर हे लोक असे देतात की, महामारीमुळे सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बिघडलेली असते. त्यातून संघर्ष आणि सरतेशेवटी युद्ध होते. काहीजण असेही म्हणतात की, महामारीमुळे अर्थव्यवस्था ढासळलेली असते. महागाई, भूकबळी वाढतात. त्यामुळे राज्ये अथवा देशांमध्ये विद्रोह भडकतो आणि युद्धे होतात. उदाहरणार्थ, करोना महामारीमुळे कॅनडा आणि युरोपातील जनतेचा सरकारविरुद्ध रोष वाढला आहे आणि रस्त्यांवर निदर्शने होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
पहिले महायुद्ध 28 जुलै 1914 रोजी सुरू झाले आणि 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चालले. 1918 मध्ये एचवन-एनवन अर्थात स्पॅनिश फ्लू (एन्फ्लुएन्जा) आला आणि संपूर्ण जगात हाहाकार माजला. या विचित्र तापाने सुमारे 50 कोटी लोकांना विळखा घातला आणि जगभरात सुमारे 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. केवळ भारतातच त्यावेळी अंदाजे 20 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. अर्थात, त्यासाठी युद्धाला नव्हे तर 1914 ते 1919 च्या दरम्यान युरोपात आलेल्या प्रचंड थंडीच्या लाटेला कारणीभूत मानले गेले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. कॉलराची लाट 1817 नंतर 1826, 1852, 1860, 1967 आणि 1881 मध्ये आली होती. याच काळात अनेक छोटी-मोठी युद्धेही सुरू होती.
त्याच दरम्यान अतिसाराचीही (1852 ते 1860) मोठी लाट उसळली होती. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात 1 सप्टेंबर 1939 रोजी झाली होती आणि त्या युद्धाचा शेवट 2 सप्टेंबर 1945 रोजी झाला होता. या काळात पोलिओने महामारीचे रूप धारण केले होते. 1940 आणि 1950 या दशकांदरम्यान पोलिओचा आजार उत्कर्षबिंदूला पोहोचला होता, असे दिसून येते. या आजाराने दरवर्षी 5 लाखांहून अधिक लोकांना अपंग केले. अनेकांच्या मृत्यूसही तो आजार कारणीभूत ठरला. दरम्यान, हिरोशिमा आणि नागासाकीवर जेव्हा अणुबॉंब टाकण्यात आला त्यानंतर प्रचंड दुष्काळ पडला, जलवायू परिवर्तन झाले आणि त्यानंतर जगाला एशियन फ्लू नावाच्या महामारीचा प्रकोप झेलावा लागला होता.
नॉस्ट्रेडॅमसने त्याच्या पुस्तकात तिसऱ्या जागतिक युद्धाचे भाकित केले होते. धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पडेल, काळ्या आणि पांढऱ्या रंगांबरोबरच लाल आणि पिवळा रंगही आपापल्या अधिकारांसाठी एकमेकांना भिडतील, असे त्याने सांकेतिक भाषेत लिहून ठेवले आहे. रक्तपात, महामाऱ्या, दुष्काळ, अवर्षण, युद्ध आणि भूक यामुळे मानवता त्रस्त होईल, असे त्याचे भाकित आहे. जलवायू परिवर्तनाचे परिणाम आपण भोगत आहोतच. नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. करोनाची साथ नुकतीच येऊन गेली आहे. युद्ध नुकतेच सुरू झाले आहे आणि ते कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही. अर्थात, ज्या घटनांमागे कार्यकारणभाव नाही, त्यांच्या बाबतीत केवळ भविष्यवाणीच्या आधारावर विश्वास ठेवणेही चुकीचेच ठरेल. एकदा एखादी गोष्ट घडणारच आहे असे आपल्या मनाने मान्य केले की, ती टाळण्यासाठी आपण काही करत नाही. अशी मानसिकता जगाच्या सध्याच्या नाजूक काळात योग्य ठरणार नाही.
विनिता शाह