पिंपळे निलख, दि. 12 (वार्ताहर) – रक्षक चौक ते जगताप डेअरी येथील बीअरटीएस रस्त्याचे वर्षात तीन वेळा खोदकाम केले आहे. एक काम पूर्ण झाले की दुसरे काम करण्यासाठी पुन्हा त्याच ठिकाणी रस्ता खोदला जात आहे. त्यामुळे येथून ये-जा करणारे नागरिक व वाहनचालक महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्रस्त आहेत.
सांगवी फाटा ते काळेवाडी फाटा दरम्यान मुख्य बीअरटीएस रस्त्यावर असलेल्या दोन्ही बाजूला असलेल्या पदपथाचे काम सुरू आहे. मागील वर्षात या रस्त्यालगत पदपथ तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत काम हाती घेण्यात आले होते. मात्र, स्मार्ट सिटी अंतर्गत दिलेले काम संबंधित ठेकेदाराने पूर्ण केले नाही. त्यामुळे नव्याने वर्क ऑर्डर काढून दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. अशी माहिती स्थापत्य अभियंता बीअरटीएस मनोज सेठिया यांनी दिली.
मागील वर्षी ज्या ठेकेदाराला काम दिले होते त्या वेळी देखील बीअरटीएस अभियंता असलेल्या मनोज सेठिया हेच काम पाहत होते. आता नव्याने वर्क ऑर्डन देऊन ठेकेदार नियुक्त केला परंतु अभियंता मात्र तोच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमधून महापालिकेच्या कामकाजाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम करण्याची जवळपास ही तिसरी वेळ असून, पुन्हा पुन्हा रस्त्याची खोदकाम करून व पुन्हा दुरुस्ती करूनही आता तिसऱ्यादा खोदकाम करून महापालिका प्रशासन फक्त ठेकेदारांचे पोट व खिसे भरत असल्याचा व नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
विस्तृत पदपथामुळे रस्ता होतोय अरुंद
सांगवी फाटा ते वाकड बायपास तसेच जगताप डेअरीपर्यंत रहिवासी भाग नाही. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा ठेवण्याची गरज असताना वारंवार येथील रस्त्याची खोदाई करण्यात येत आहे. आता या ठिकाणी विस्तृत पदपथ बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुख्य रहदारीचा मार्ग अरुंद बनला आहे. त्यामुळे या भागात नागरीवस्ती नसताना पदपथ कोणासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
अशास्त्रीय पद्धतीने रस्ता खोदाई
वाकड बायपास, चोंधे पाटील जंक्शन वरील रस्त्याचे खोदकाम करताना ठेकेदार नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. या मार्गावर ठिकठिकाणी झाडे आहेत. परंतु खोदाई करताना ठेकेदाराकडून झाडांच्या बुंद्याची काळजी न घेता खोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे झाडांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील पर्यावरण प्रेमींकडून महापालिकेच्या गलथान कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.