Rice Price Hike: तांदळाच्या दरातील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मोठ्या मागणीमुळे तांदळाच्या किमतीने 15 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे तांदळाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. आशियाई आणि आफ्रिकन खंडातील देशांमध्ये, तांदूळ हे लोकांच्या जेवणातील मुख्य अन्न आहे. मात्र तांदळाच्या महागाईने आधीच लोकांच्या अडचणी वाढवल्या असून आगामी काळात तांदूळ आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तांदळाचे भाव 15 वर्षांच्या उच्चांकावर –
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, थाई राइस एक्सपोर्टर्स असोसिएशनने म्हटले आहे की, 2008 नंतर आता तांदळाचे भाव उच्चांकी पातळीवर गेले आहेत. बुधवारी (दि. 20) थाई व्हाईट राइस ब्रोकेल एशियन बेंचमार्क याची किंमत 2.5 टक्यांनी वाढली आणि 650 डाॅलर प्रतिटनवर पोहोचला आहे. भारतातून तांदूळ निर्यातीवर बंदी आणि थायलंडमध्ये भात पिकाचे झालेले नुकसान हे तांदळाच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये किमतीत नरमाई दिसून आली होती, परंतु नोव्हेंबरपासून किमतींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. एल निनोमुळे आशिया खंडातील भात पिकांना मोठा फटका बसला आहे.
तांदळाच्या वाढत्या किमतीमुळे भारत सरकार हैराण –
भारतातही तांदळाच्या किमती वाढल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत, त्यानंतर नुकतेच सरकारने तांदूळ कारखान्यांना तांदळाच्या किमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी चार महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत तांदळाचे दर वाढल्याने सरकारही चिंतेत आहे.
एका वर्षात तांदूळ 15 टक्क्यांनी महागले –
ग्राहक व्यवहार किंमत निरीक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात तांदळाच्या किमतीत सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आकडेवारीनुसार, 21 डिसेंबर 2022 रोजी तांदळाची किरकोळ किंमत 37.99 रुपये प्रति किलो होती, ती आता 20 डिसेंबर 2023 रोजी वाढून 43.51 रुपये प्रति किलो झाली आहे. तांदळाचे विविध प्रकार आहेत त्यानुसार किंमती वेगवेगळ्या आहेत. मात्र सर्वच प्रकारच्या तांदळांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
तांदूळ कंपन्यांनी दर कमी करण्याचे आदेश दिले –
18 डिसेंबर 2023 रोजी, ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि पुरवठा विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी तांदूळ प्रक्रिया उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि गैर-बासमती तांदळाच्या किमतींचा आढावा घेतला. या बैठकीत सचिवांनी या प्रतिनिधींना देशांतर्गत बाजारपेठेतील तांदळाचे भाव तातडीने कमी करण्याचे आदेश दिले आणि नफेखोरी टाळण्याचा सल्ला दिला. गेल्या दोन वर्षांत तांदळाच्या दरात वार्षिक १२ टक्के वाढ झाल्याबद्दल सरकारने चिंता व्यक्त केली.
भाताचे उत्पादन कमी होऊ शकते
मात्र, या खरीप हंगामात भारतातील तांदूळ उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. गेल्या 8 वर्षांत प्रथमच तांदूळ उत्पादनात घट होऊ शकते. भारत हा तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि यावर्षी जुलै 2023 मध्ये सरकारने देशांतर्गत बाजारातील किमती नियंत्रित ठेवण्यासाठी गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.