पुणे, दि. 28 -गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी रस्त्यांवर उभारलेले मांडव काढले असले तरी मांडवासाठी खोदलेले खड्डे मात्र तसेच ठेवले आहेत. उत्सव संपून महिना होत आला तरी शहरातील अनेक रस्त्यांवर हे चित्र कायम आहे. मंडळांच्या उदासीनतेमुळे हे खड्डे पादचाऱ्यांच्या जिवावर उठत असून, ते बुजविणार केव्हा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उत्सव संपल्यानंतर मांडव काढण्याबरोबरच खड्डेही तत्काळ बुजविण्याचे आश्वासन मंडळांनी महापालिकेच्या बैठकीत दिले होते. मात्र हे आश्वासनच मंडळांनी खड्ड्यात घातले आहे. मध्यवर्ती भागात एकाच रस्त्यावर दोन ते तीन सार्वजनिक मंडळांनी मांडवासाठी खड्डे घेतले. मात्र, हे खड्डे आजही रस्त्यावर तसेच आहे. शहरातील रस्त्यांची आधीच पावसाने चाळण केली आहे. त्यात या खड्ड्यांची भर पडली आहे. हे खड्डे खोल असल्याने दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांचे पाय मुरगळण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या आहेत.
कायमस्वरूपी लोखंडी गाळे
रस्त्यांचे बऱ्याच ठिकाणी कॉंक्रिटीकरण झाले आहे. ते करताना मांडवांच्या खांबांसाठी धातूचे पाइप रस्त्यांत टाकून गाळे केले आहेत. उत्सव संपल्यावर या गाळ्यांत पुन्हा माती भरणे गरजेचे आहे. मात्र याकडे प्रशासनाबरोबरच मंडळेही दुर्लक्ष करीत आहेत.