श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – भंडारदरा धरणातून शेतीचे आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने पाणी सोडण्यात यावे, अशा सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे पाणी पुरेशा दाबाने सोडण्यात येणार असल्याची माहिती भाजपा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी दिली.
भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. तथापि, धरणातून सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होत नाही. सबब मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे भरणे होऊ शकणार नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही उभी पिके करपण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. ही बाब लक्षात घेऊन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जलसिंचनच्या अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुरेशा दाबाने पाणी सोडण्याबाबतच्या सूचना दिल्या. श्रीरामपूर भागात प्रवरा डाव्या कालव्यांना तातडीने पुरेशा दाबाने पाणी सोडण्यात येणार असून, जेणेकरुन उभ्या पिकांचे भरणे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले भरणे पूर्णपणे भरून घ्यावेत, असे आवाहन भाजपा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी केले.