श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- करजगाव (ता. राहुरी) येथील ग्रामस्थांच्या विनंतीनुसार प्रवरा नदीपात्रातील वाळू उपसा करू नये, या मागणीसाठी आ. लहू कानडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्यांचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत आ. कानडे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांना पत्र दिले आहे. शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार लाख (ता. राहुरी) येथे वाळू डेपो स्थापन करण्यात आला आहे. डेपोसाठी करजगाव (ता. राहुरी) हद्दीतील प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी मंडलाधिकारी व तलाठी जागा अधिग्रहण करण्यासाठी दि. २२ मे रोजी येथे आले होते.
तथापि ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी करजगाव हद्दीतील नदीपात्रातून वाळू उपसा करू नये, ग्रामसभेनेही तसा ठराव केलेला आहे. वाळू उपसा केल्याने भूगर्भातील पाणी कमी होते आणि तेथे असणाऱ्या गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरींना पाणी राहत नाही. शिवाय आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरीही कोरड्या पडतात. त्यामुळे करजगाव ग्रामस्थ वाळू उचलण्यास विरोध करीत आहेत, असे सांगितले. तरीही संबंधित कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.
करजगाव ग्रामस्थांनी यापूर्वीही नदीपात्रातील वाळू उपसू दिलेली नाही. ग्रामस्थांकडून तेथे कोणत्याही प्रकारच्या वाळूची चोरी केली जात नाही. यामुळे सर्व ग्रामस्थांच्या विनंतीचा विचार करून करजगाव हद्दीतील नदीपात्रातून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झाले असले तरी देखील वाळू उपसा करण्यात येऊ नये. तेथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे पत्रात म्हटले आहे.