पुणे : महापालिकेकडून शहरात प्रत्येक गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. मात्र, येत्या गुरुवारी (दि. 29) आषाढी एकादशी असल्याने या दिवशी शहरात पूर्ण वेळ पाणी देण्यात येणार आहे. कोणत्याही जलकेंद्रांतर्गत पाणी बंद ठेवले जाणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
या दिवशी पाणी सुरू ठेवण्याबाबत विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी महापालिकेकडे मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत यंदा पाणीसाठा कमी आहे. त्यातच हवामान विभागाने यंदा मान्सून कमी होणार असून, जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले आहे.
त्यामुळे राज्य शासनाने पाटबंधारे विभाग आणि महापालिकेस खडकवासला धरण साखळीतील पाणी 31 ऑगस्ट अखेरपर्यंत राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका आणि पाटबंधारे विभागाने संयुक्त बैठकीनंतर महापालिकेने प्रत्येक गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 18 मे पासून शहरात त्याची अंमलबजवाणी सुरू आहे.