पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आयोजित पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’करिता आजपर्यंत ५५ हजार ७२ रिक्तपदे कळविण्यात आली आहे. नावनोंदणी केलेल्या, तसेच नोंदणी करावयाचे राहून गेलेल्या इच्छुक अन्य उमेदवारांनीही थेट मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत बारामती येथे दि. २ आणि ३ मार्च रोजी पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकरिता आजपर्यंत ३४७ आस्थापना सहभागी झाल्या असून, त्यांच्याकडून ५५ हजार ७२ रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत, तर आतापर्यंत ३३ हजारावर युवक- युवतींनी रोजगारासाठी नावनोंदणी केली आहे.
मेळाव्यादरम्यान उपस्थित कंपन्यांमार्फत रोजगार इच्छुक असणाऱ्या दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी आदी पदवीप्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तेथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. तथापि, शिक्षण पूर्ण झालेल्याच नव्हे, तर आयटीआयच्या शेवटच्या वर्षात असलेल्या उमेदवारांनाही कंपन्या शिकाऊ योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संकेतस्थळावर नोंदणी
हा मेळावा ३ मार्च रोजीही असल्याने अद्याप नोंदणी न केलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करून मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, तसेच मेळाव्याच्या ठिकाणीही ऑफलाइन नोंदणीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.