कोल्हार – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील जलजीवन मिशन योजना ही नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याची असली, तरी या योजनेमुळे गावातील राजकारण दूषित झाले असून, गावात वाद निर्माण होत आहेत. गेल्या दीड वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या योजनेचे अद्यापही काम मार्गी लागत नसल्याने आणि या कामांमध्ये ठेकेदार ग्रामस्थांना सहकार्य करत नसून ग्रामपंचायत सदस्यांनादेखील विश्वासात घेत नसल्याने या योजनेची फेरनिविदा काढण्यात यावी, असा ठराव जलजीवन मिशनच्या विशेष ग्रामसभेत मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
कोल्हार खुर्द येथे जलजीवन मिशन योजना मंजूर झाल्यापासून गावासाठी डोकेदुखी ठरत आहे. मंजुरी पूर्वीपासूनच्या बैठका, गावातीलच ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्याचा आग्रह, मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई, काम सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने ग्रामस्थांना दाखवलेला ठेंगा, कामाचा दर्जा आणि ग्रामस्थांचे माहिती अधिकारात पडलेले अर्ज यामुळे गेल्या वर्षभरापासून ही योजना रेंगाळली होती.
मात्र, राज्यभरात प्रगतिपथावर असलेल्या या योजनेत अनेक अडचणी निर्माण होत असताना दिसत असल्यामुळे शासन स्तरावरून दि. 14पर्यंत स्थानिक पातळीवर या योजनेबाबत अडीअडचणी समजून घेण्याच्या दृष्टीने ग्रामसभा घेण्याचे आदेश पारित केले होते. त्यानुसार काल (शुक्रवार) सिद्धिबाबा मंदिर येथे ग्रामसभा घेण्यात आली.
ग्रामसभेत केवळ जलजीवन मिशन हा एकमेव विषय असल्याने ग्रामसभा सुरू होताच ग्रामस्थांनी ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत आलेल्या अडचणींचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला. यामध्ये संबंधित ठेकेदार हा काम करत असताना ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाही, जलवाहिनीचे खोदकाम करताना अनेक ठिकाणी रस्ते परवानगी नसताना खोदले, अशा अनेक बाबी ग्रामसभेत चर्चेत आल्याने या योजनेची फेरनिविदा काढण्यात यावी, अशी सूचना काही जबाबदार ग्रामस्थांनी केली असता उपस्थितांपैकी जवळपास निम्म्यापेक्षा जास्त ग्रामस्थांनी याला सहमती दर्शवल्याने या योजनेची फेरनिविदा काढावी अशी प्रमुख मागणी या सभेत करण्यात आली.
पदाधिकारी निरुत्तर
या योजनेत अनेक ठिकाणी जलवाहिन्या गाडण्यात आली असून, याची बिले कशी मंजूर केली या प्रश्नावर योजनेचे अधिकारी- पदाधिकारी निरुत्तर झाले. त्यामुळे या योजनेत मोठा भ्रष्टाचार असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात होते.
दोन निवृत्त राजकारण्यांचे वाद चर्चेचा विषय
एकेकाळी गावावर आपल्या अष्टपैलू शैलीने राजकारण करणाऱ्या दोन राजकारण्यांचे या सभेदरम्यान चांगलीच हमरीतुमरी झाल्याने हा वाद गावात चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे गेल्या 50 वर्षांचे राजकीय वैर यातून चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.