नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्यता न देता बारामतीला उभारण्याचा घाट घालण्यात आला. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. यासाठी स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेने
नारायणगाव येथे गुरुवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत जुन्नरची बिबट सफारी वाचविण्यासाठी पत्रकार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, लोकप्रतिनिधी व समाजातील प्रत्येक घटकानेएकत्रित येऊन जनआंदोलन उभे केले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विजय कोल्हे, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, सचिव मारुती जाधव, विश्वस्त शेखर नलावडे, संजय वारुळे, सुजित खैरे व पत्रकार उपस्थित होते. बिबट सफारी जुन्नर तालुक्यात झाली तरच बिबट्याला संरक्षण मिळेल व पर्यटनात वाढ होईल, असे संस्थेने म्हटले आहे.
स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेचे उपक्रम
- तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देऊन सरपंचाच्या पाठिंब्याचे पत्र मिळवणे
- बिबट्यामुळे जखमी व मृत्यू पावलेल्या नातेवाईकांच्या भेटी घेऊन तालुक्यातील बिबट सफारी विषयी त्यांची मते जाणून घेणे
- बिबट सफारीमुळे बेरोजगारांना व्यवसायाच्या व नोकरीच्या संधी प्राप्त होणार
- गावागावात यात्रेच्या निमित्ताने भेटी देऊन जनजागृती करणे
- बिबट सफारी वाचविण्यासाठी मंदिरांत जाऊन परमेश्वराला साकडे घालणे
- बॅनर लावणे, चौकसभा घेणे, तज्ञांचे मार्गदर्शन घेणे, लोकसहभाग वाढवणे
- बिबट सफारी वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींना स्वराज्य संस्थेकडून पाठबळ देणे