पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – समाविष्ट ३४ गावांमध्ये महापालिकेकडून दररोज सरासरी १,२०० टॅंकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हे टॅंकर मोफत असताना पाणी नेल्यानंंतर संबंधित टॅंकरचालक अथवा मदतनीस नागारिकांना पैसे मागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यासाठी पालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारींचा पाऊस सुरू आहे.
यातील एकही तक्रार पैसे मागितल्याची नाही तर या सर्व तक्ररी पाणी न आल्याच्या आहेत. त्यावरून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे पुन्हा समोर आले आहे. यात सर्वाधिक तक्रारी दोन दिवसांपासून पाणीच येत नसल्याच्या असून त्या खराडी आणि सूस, म्हाळूंगे, आंबेगाव भागातील आहेत. समाविष्ट अकरा गावांसाठी दररोज ३०० फेऱ्या, तर २३ गावांसाठी ८०० फेऱ्या होत आहेत.
मात्र, हे टॅंकर घेऊन गेलेले कर्मचारी नागरिकांची अडवणूक करत असून ते पैसे मागत असल्याच्या तक्रारी महापालिकेस आल्या होत्या. त्याची दखल घेत प्रशासनाने मागील आठवड्यात हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. मात्र, त्यावर नागरिक पाणी न येण्याच्या तसेच कमी वेळ पाणी आल्याच्याच तक्रारी करत आहेत. प्रामुख्याने महापालिकेने दिलेला टोल फ्री क्रमांक आणि पीएमसी केअर यावर तक्रारी वाढल्या असून, त्या सोडवण्यासाठी पाणीपुरवठा विभागास पाठवण्यात आल्या आहेत.
पाणी बंदचा फटका
महापालिकेकडून शहराच्या बहुतांश भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सलग तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. त्यातच महावितरणचा वीज पुरवठ्यातही अडचणी असल्याने त्याचा फटकाही पाणी वितरणावर झाला आहे.
पाण्याची मागणी वाढल्याने महापालिकेची कसरत उडाली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झालेला आहे. शुक्रवार तसेच शनिवारी पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा विस्कळीत झाल्यानेही पेठांमध्ये तसेच मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.